Tuesday, 12 December 2017

कुंडलिनी शक्ती

🍁🍁 *कुंडलिनी शक्ती* 🍁🍁

कुंडलिनी ही एक शरीरात वास करणारी शक्ती आहे. निरनिराळ्य़ा लोकांना तिचा साक्षात्कार निरनिराळ्या प्रकारे झाल्याने तिच्या व्याख्या नानाविध प्रकारांनी केल्या आहेत. तंत्रसाहित्यात कुल व अकुल हे शब्द शक्ती व शिव वाचक आहेत. कुलकुंडलिनी वा कुंडलिनी म्हणजे वेटोळ्या घातलेल्या स्वरूपातील शक्ती. या शक्तीचे चित् व अचित् असे दोन भेद आहेत. चित् शक्ती आत्म्याशी अभिन्न स्वरूपात राहते. अचित् शक्ती जगत प्रकाशित करते. ही कुलकुंडलिनी शरीरात सुप्त अवस्थेत असते. कुंडलिनी शरीरात मुलाधार चक्रात गहन निद्रेत असते. सहस्रारचक्रात वास करणार्‍या शिवापाशी मुलाधारचक्रात वास करणार्‍या निद्रित कुंडलिनीला जागृत करून नेणे हे योग्याचे ध्येय.

ही कुंडलिनी जप, तप, ध्यान, कीर्तन, भक्ती, ज्ञान, कर्म, मुद्रा, बंध, शक्तिचालन, प्राणायाम, शक्तिपात इ. प्रकारांनी जागृत होते.
हठयोगातील प्राणायाम व बंध यांचा कसा उपयोग केला जातो याचा थोडासा विचार पुढे केला आहे.साधे एक, दोन, तीन शिकावयास गुरू लागतो. तेव्हा इथे गुरूची व कठोर परिश्रमाची नितांत गरज आहे. इथे आपण फक्त प्राथमिक माहिती बघणार असल्याने अत्यंत थोडक्यात काही गोष्टींची नोंद करू.
प्राणायाम ... श्वासोच्छ्वासावर प्रभुत्व मिळवणे. पूरक (बाहेरचा वायू नासापुटाने उदरात भरून घेणे), कुंभक (पूरकाने आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवणे) , रेचक (उदरातील वायूला नासापुटाने बाहेर सोडणे) व यांमधील विराम म्हणजे प्राणायाम. श्वास घ्या, थोडा वेळ थांबा, श्वास सोडा, थोडा वेळ थांबा, परत श्वास घ्या ही प्रक्रीया. यातील निरनिराळे प्रकार म्हणजे उदा. एका नाकपुडीने श्वास घ्रेऊन दुसर्‍या नाकपुडीने सोडणे. ही शारीरिक प्रक्रीया झाली. याला म्हणावयाचे अगर्भ प्राणायाम. जर आपण प्रणवाच्या मात्रांचे, पूरकाच्या वेळी "उ"चे कुंभकाचे वेळी "म्" चे व रेचकाचे वेळी "अ"चे ध्यान केले तर तो झाला सगर्भ प्राणायाम.
प्राणायामाने आरोग्य सुधारते, अनेक रोग बरे होतात, आयुष्य वाढते असे शारीरिक फायदे होतात व वृतीला स्थिरपणा येतो,चांचल्य कमी होते, रज-तम वासना कमी होतात, सत्व गुणाचा प्रकाश पसरतो असे आध्यात्मिक लाभ होतात. हठयोगात नाडीशुद्धी हा एक मोठा फायदा. नाडीशुद्धी झाली व चित्ताची एकाग्रता साधता आली की साधकाला अनाहत नाद ऐकू येऊ लागतो. तबल्यावर थाप मारल्यावर जो आवाज येतो तो आहत, "ठोकल्याने", तार "छेडल्याने" आलेला नाद. अनाहत नाद अशा कोणत्याही आहताने निर्माण झालेला नसतो. हा अनाहत नाद तुम्हाला ऐकू येऊ लागला की तुम्ही तुमच्या लक्षाच्या जवळ आला आहात असे समजावे. अशी समाधी म्हणजे नादानुसंधानी समाधी. या मार्गावर पोचण्यास प्राणायामास यम-नियम-ध्यानादिंची जोड आवश्यक असते.

बंध ... . कुंभकाचे वेळी प्राणनिरोध करीत असतांना नवद्वारांपैकी काही द्वारे बंद करावयाची असतात. त्या वेळी या बंधांचा उपयोग होतो. शरीरातील एखाद्या विशिष्ट भागातून वायू खेचून दुसर्‍या एखाद्या भागात स्थिर करण्या साठी बंधांचा वापर होतो. . हठयोगात "बंधां" ना फार महत्व आहे. प्राणायामाने प्रभुत्व मिळवलेला प्राणवायू आपल्याला पाहिजे तेथे, पाहिजे त्या नाडीत नेणे, तेथे तो थांबविणे हे या बंधांचे काम. निरनिराळ्या आसनांत हे करतात. शरीरातील वायूंवर विजय मिळवूवच त्यांच्या सहाय्याने कुंडलिनीला जागृत करावयाचे असल्याने बंधांचा अभ्यास अनिवार्य आहे.आपण तीन बंध बघणार आहोत

जालंधर बंध ... कंठाचा संकोच करून हनुवटीला छातीच्या वरच्या बाजूस कंठाजवळ असलेल्या आडव्या दोन्ही हाडांच्या मध्यभागी दाबून धरावे म्हणजे जालंधर बंध होतो.कंठस्थानी असलेल्या शिरांचे जाळे बांधले जाते म्हणून याला जालंधर बंध म्हणतात.आणखी एक विचार. मूर्धस्थानी असलेल्या पूर्णचंद्रातून स्त्रवणारे अमृत देहाच्या मध्यभागी आले की जाठराग्नीने शुष्क होऊन जाते. याच कारणाने देह लवकर जीर्ण होतो. जालंधर बंधाने अमृत सरळ पचन मार्गात न उतरता सर्व शरीरभर पारते व योग्याचा देह लवकर जीर्ण होत नाही. (योगी काही शतके जगू शकतो याचे कारण ?)
उड्डियान बंध ... हा बंध उदरस्थानी करावयाचा असतो. नाभिस्थानाचा खालचा भाग व वरचा भाग अशा या दोनही
भागांचा संकोच करून पोटाला पृष्ठ्वंशाकडे खेचून घ्यावे. पाठीला पोक येऊं न देता सर्व शरीर ताठ ठेवावे. यालाच उड्डियानबंध म्हणतात. या बंधाने पोट नेहमी साफ राहते. ज्याचे पोट साफ़ त्याचे आरोग्य उत्तम. याला "मृत्युमातंगकेसरी" म्हटले आहे व याच्या अभ्यासाने "वृद्धोsपि तरुणायते" वृद्धही तरुण होतो असे म्हटले आहे. उड्डियान बंधाने प्राण, अपान,व्यान,उदान व समान या पाचही वायूंची कार्ये सुव्यवस्थित होत असल्याने शरीराचे सर्वांगिण आरोग्य सुरक्षित रहाते म्हणून "सर्वेषामेव बंधानामुत्तमोह्युड्डियानक:" असा याचा गौरव केला आहे.
मूलबंध ...सिद्धासनात सांगितल्याप्रमाणे डाव्या पायाची टाच सीवनीच्या (उपस्थ व गुदद्वार यांच्यामध्ये असलेली शीर) मध्यभागी दाबून बसवावी. गुदद्वाराचे अधिकात अधिक आकुंचन करूनपान वायूला वर खेचावे. शरीर ताठ ठेवावे. दृष्टि नासाग्री असावी. मूलबंधाने अपान वायू हा उर्ध्वगामी होत असतो. अनाहत ध्वनी अभिव्यक्त होण्यास मूलबंधाचा चांगलाच उपयोग होत असतो.
आपण नेहमी श्वासोच्छ्वास करतो तेव्हा डाव्या व उजव्या नाकपुडीतून आत येणारा वायु ईडा व पिंगला नाडीतून प्रवास करत असतो. प्राणायामाच्या अभ्यासाने व बंधांच्या उपयोगाने आपण ही नैसर्गिक क्रिया बदलून टाकतो. आता ईडा व पिंगला यांचा वापर बंद करावयाचा आहे .त्या ऐवजी सुषुम्ना नाडीतून प्राणवायू न्यावयाचा आहे. पण सुषुम्नाचे तोंड तर बंद असते. ते उघडण्यासाठी प्रथम बंधांच्या सहाय्याने उर्ध्वगामी, वर जाणारा प्राणवायू खाली वळवावयाचा व मूलबंधच्या उपयोगाने खाली सरणारा अपान वायु उर्ध्वगामी करावयाचा. प्राणवायू व अपानवायू यांचा संगम नाभीच्या अधोभागी होतो. त्यांच्या समागामाने स्वाधिष्ठानचक्रातील व मणीपूरचक्रातील अग्नी प्रदिप्त होतो. ह्या अग्नीच्या तापाने कुंडलिनी जागृत होते व सुषुम्ना नाडीचे तोंड उघडते. प्राण व अपान सुषुम्ना नाडीतून वर जाऊ लागले की नाद उत्पन्न होतो. तोच अनाहत नाद. वर लिहले आहे की अनाहत नाद ऐकू येऊ लागला की समजावे की तुम्ही ध्येयाच्या जवळ पोचला अहात. तुम्ही त्यापासून मिळणार्‍या आनंदात बेहोष होता. अनेक संतांनी या अनाहत नादाबद्दल रम्य अभंग लिहले आहेत. आता सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले आहे, कुंडलिनी जागृत झाली आहे व ती आता आपले मूलाधार चक्रातील स्थान सोडून वर सह्स्रारचक्राकडे निघाली आहे. पुढील भाग मी रुक्ष गद्यात सांगणार आहेच पण माझा आग्रह आहे की आपण तिच्या प्रवासाचे वर्णन श्री माउलींच्या शब्दात वाचावेच. गीतेत कुंडलिनीचा उल्लेखच नाही पण या बालयोग्याने अध्याय ६ मध्ये आपल्या नाथपंथातील विचार मोठ्या रसिकपणाने मांडले आहेत. परत एकदा, वाचाच.

कुंडलिनी ...मुलाधार चक्रात अचित् शक्ती सर्पासारखे साडेतीन वेटोळी घालून अधोमुख निजलेली असते. आता ती प्राण-अपान वायूंच्या संयोगाने निर्माण झालेल्या अग्नीच्या तापाने जागृत होते. सुषुम्ना नाडीचे तोंड उघडले गेलेले असल्याने ती त्या नाडीत प्रवेश करते व वर सहस्रारचक्रात जाण्यास प्रवृत्त होते. तिच्या बरोबर प्राणवायू व साधकाचे मनही असतात. तिचा मार्ग तेव्हढा सुकर नाही. तिला जातांना वाटेतील षटचक्रांमधून (चित्र पहा) पुढे जावयाचे असते. ही महाकठीण क्रीया सद्गुरूच्या सहाय्यानेच शक्य होते. वर वर जातांना कुंडलिनी जे जे पार्थिव ते ते सर्व सर्व गिळंकृत करते. जेव्हा प्राण-मन यांच्यासह ती सहस्रारचक्रात वास करणार्‍या शिवाशी एकरूप होते तेव्हा साधकाला समाधीचा अनुभव प्राप्त होतो. साधकाचे मन ब्रह्मात लीन होते व विषयविचारापासून तो पूर्णत: अलिप्त होतो. समाधी बद्दल इथे लिहण्याचे कारण नाही. तो एक निराळाच विषय आहे. पण कुंडलिनी जागृतीमुळे होणारे परिणाम थोशक्यात बघू. प्राणवायू सुषुम्ना नाडीतून वाहू लागला की सहाजिकच तो ईडा- पिंगला मधून वाहणे कमी होते. साधकाचा श्वासोच्छ्वास कमी कमी होऊ लागतो. त्याची जीवनाला आवष्यक असलेली उर्जेची गरज कमी कमी होऊ लागते. अन्न-पाणी न घेता तो दीर्घ काळ राहू शकतो. ( याला Hybernation म्हणावयाचे काय ?) प्राणवायू मूर्धस्थानी स्थिरावला की त्याला केवलकुंभक म्हणतात. आचार्य म्हणतात "केवलकुंभकाचे वैभव प्रतीतीला येण्यासाठी चित्तची शुद्धी, सावधानता आणि अभ्यासाची धृढता यांची गरज आहे."
ही झाली कुंडलिनीची प्राथमिक माहिती. हिच्यावर प्रभुत्व मिळाले तर तुम्ही समाधी सुख मिळवू शकता. पण अपार कष्टाने मिळवलेल्या या सुखात विघ्नेही आहेत. तुम्हाला अनेक सिद्धीं प्राप्त होतात. त्यांची यादी देत नाही परंतु इहलोकातील नानाविध सुखे तुमच्या पायाशी लोलण घेतात व साधक त्यांतच गुरफटण्याचा संभव असतो. तंत्रग्रंथांत या विषयी धोक्याच्या सुचना दिलेल्या दिसतात. आपला त्याच्याशी काही संबंध नाही म्हणा.

*चैतन्य गुरुआई नमो नमः*

No comments:

Post a Comment