Tuesday, 12 December 2017

शंकर महाराज व कान्हेरे गुरुजी

श्री शंकर महाराजांच्या अनेक शिष्यांपैकी एक असलेले कान्हेरे गुरुजी. यांच्यावरती पण महाराजांनी बरीच कृपा केली होती. त्यातला एक प्रसंग.

महाराजांच्या महासमाधीच्या आदल्या दिवशी महाराजांनी कान्हेरे गुरुजींना संध्याकाळी ७:३० वाजता जेवावयास बोलावले होते. गुरुजी जाण्यास निघणार एवढ्यात एक कीर्तनकार त्यांचा तबलजी न आल्याने गुरुजींना साथ देण्यासाठी घेऊन गेले. कीर्तन रात्री १० वाजता संपल्यावर गुरुजी महाराजांकडे गेले. महाराज त्यांची वाट बघत होते.

महाराजांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली आणि म्हणाले " केवळ वीस रुपयांसाठी केवढो मोठी संधी गमावलीस "

गुरुजी हात पाय धुवून पाटावर बसले. तेवढ्यात दागिन्यांनी मढलेली अत्यंत रूपवान ,लावण्यवती ; जिच्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्द अपुरे पडतील अशी सूंदर स्त्री आली आणि तिने गुरुजींना जेवण वाढले. त्या सुंदर स्त्री कडे गुरुजी काही काळ बघतच राहिले. तेव्हा महाराज म्हणाले " अरे ताटाकडे बघ "

गुरुजी थोडे शरमिंदा होऊन मान खाली घालूनच जेवायला लागले. ते जेव्हा हात धुण्यासाठी आत गेले तेव्हा ती स्त्री तिथे नव्हती. एकच दरवाजा असलेली खोली ;ती बाई गेली कुठे ? असा विचार गुरुजींच्या मनात आला. तसेच आतील खोलीत ६/७ उष्टी ताटे पडलेली होती.

ते पाहून गुरुजींनी महाराजांना विचारले " महाराज कोण कोण आले होते जेवायला ? "

महाराज : मी उद्या जाणार म्हणून स्वतः स्वयंपाक केला आणि जेवायला श्री साईबाबा ,श्री गजानन महाराज ,श्री साटम महाराज ,श्री स्वामी समर्थ या साऱ्यांना बोलावले होते. असा हा अमृत तुल्य दर्शनाचा सोहळा तुला घडावा म्हणून तुला बोलावले होते.

गुरुजी : पण महाराज त्या बाई कोण होत्या ? चटकन निघून गेल्या . गुरुजींनी न राहवता विचारले.

महाराज : अरे तुला जेवण वाढण्यासाठी साक्षात " कोल्हापूरच्या महालक्ष्मीला " थांबवले होते. तू खरोखरच भाग्यवान आहेस. आणि ऐक उद्या मी जाणार आहे तेव्हा तू इथे अजिबात यायचे नाहीस तुला ते सहन होणार नाही.

आपल्या सद्गुरूंचा हा शब्द मात्र गुरुजींनी पाळला. महासमाधीच्या दिवशी गुरुजी महाराजांकडे गेले नाहीत.

श्री शंकर महाराजांनी अशा आपल्या भक्तावर आईच्या मायेने  प्रेम केले आणि अनेक अनुभूती दिल्या.

---अल्लख निरंजन 🙏🙏

No comments:

Post a Comment