Tuesday, 12 December 2017

गुरु

 गुरुंबद्दल थोडेसे ......

*चैतन्य गुरुआई नमो नमः*

गुरु शिष्य परंपरा आपल्यापैकी कोणालाच नवी नाही.

मी कोणाला गुरु मानला म्हणजे ती व्यक्ती, सदेहि असलेला मानव असू शकतो. सदेहि नसलेला मानव असू शकतो. संत मंडळींपैकी कोणी असू शकतो. किंवा स्वामींसारखे अवतारी असू शकतात.

आता मी माझे गुरु मानले  म्हणजे मी त्यांचा शिष्य झालो. आता ह्यात परत दोन मुख्य प्रकार करता येतील. एक म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने अनुग्रह किंवा दीक्षा घेतलेला शिष्य. आणि दुसरा म्हणजे स्वयंघोषित शिष्य. आपण सर्व स्वामीभक्त दुसऱ्या प्रकारात येतो. अर्थात आध्यात्मात पहिला प्रकार उच्च प्रकारचा मानला जातो. ह्यात गुरु शिष्याचा थेट संवाद असतो किंवा घडलेला असतो. गुरूने दीक्षा किंवा अनुग्रह देण्याचे बरेच प्रकार आहेत. त्यात ९ प्रकार मुख्य धरले जातात. असो…थोडे गुरुबद्दल बोलू.

मी गुरु करण्याचे किंवा मानण्याचे मला पूर्ण स्वातंत्र्य असते. पूर्ण विचारांती मी ते काम करावे ही आध्यात्मिक अपेक्षा आहे. मात्र एकदा का मी गुरु केला की त्याची कास मी सोडू नये. मला अनेक गुरु करण्याचे स्वातंत्र्यही आहे. पण कोणत्याही केलेल्या किंवा मानलेल्या गुरूची कास मात्र कधीही सोडू नये.

वेगवेगळे गुरु करण्यामागे ज्ञानार्जन सोडून दुसरे कोणतेही कारण नसावे. हल्ली एक पाहायला मिळते. बरेचजण गुरु करतात. त्याची भक्ती, पूजा सगळे चालते. हवा असलेला अनुभव न आल्याने विश्वास ( जो मुळातच कमकुवत असतो) डळमळू लागतो. ह्या नात्याला आणि भावनेला आध्यात्मात स्थान नाही.

तेव्हा गुरु करताना तो विचारपूर्वक करावा. तो करताना आणि त्यानंतरही आपण जमेल तेवढे अपेक्षाविरहित असावे. मी गुरु केला म्हटल्यावर त्याचे फळ मला कधीना कधी मिळेल ही अपेक्षा गुरुशिष्य नात्यास घातक असते.

जन्मल्यापासून कळत नकळत आपण बरेच गुरु करतो किंवा त्यांच्या सान्निध्यात येतो. मग प्रश्न असा निर्माण होतो, की किती प्रकारचे गुरु असतात? त्याचे उत्तर संक्षिप्तपणे खालीलप्रमाणे देता येईल.

गुरु हे मुख्यतः दोन प्रकारचे असू शकतात. एक अंतर्गत आणि एक बहिर्गत. पण एक सच्चा शिष्य बहिर्गत गुरूस कालांतराने त्याचा अंतर्गत गुरु होण्यास भाग पाडतो.

पिश्चीला नावाचे आध्यात्मात एक तंत्र ( हे तंत्र मंत्र मधील तंत्र नव्हे) आहे. त्यानुसार गुरु हा दोन प्रकारचा असतो. एक असतो दीक्षा गुरु आणि एक असतो शिक्षा गुरु.

तसेच कुलागम नावाचे आध्यात्मात अजून एक तंत्र आहे. त्यानुसार गुरु हा ५ प्रकारचा असतो.

प्रेरक, सूचक, वाचक, दर्शक, बोधक, शिक्षक हे ते ५ प्रकार.

गुरुचे आपल्या शिष्याला योग्य मार्ग दाखवणे, त्याला स्वार्थाकडून परमार्थाकडे नेणे, किंवा सद्गुरूच्या जवळ जाण्याची वाट दाखवणे ही कर्तव्ये असतात. आता सगळ्या बाजूने विचार केल्यास ही सर्व कर्तव्ये योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन ह्यात मोडतात.

पण शिष्याचे तसे नसते. शिष्याची आपल्या गुरुसाठी खूप कर्तव्ये असतात. त्यातील सगळ्यात पहिले म्हणजे संपूर्ण शरणागती. शिष्याच्या कर्तव्याबद्दल नंतर बोलू. आज गुरुबद्दल.

योग्य गुरूंची काही स्वाभाविक लक्षणे असतात. अर्थात ही नसतील तर तो गुरु नाही असे नाही. पण त्यातल्या त्यात ही लक्षणे असतातच

१) सर्वप्रथम आध्यात्मिक गुरु आपल्या शिष्यात कधीही भेदाभेद करत नाही. एक प्रिय आणि दुसरा अप्रिय असे प्रकार गुरुच्या ठायी नसतात. तो सर्वस्वी शिष्यांचा दृष्टीकोन असतो.

२) आध्यात्मिक गुरु, शिष्यात एका ठराविक पातळीपर्यंतच भावनिक गुंतवणूक करतो. कारण अवास्तव  गुंतवणूक प्रसंगी त्याच्या कठोर भूमिकेच्या आड येऊ शकते.

३) आध्यात्मिक गुरु, आपल्या शिष्यांकडून कधीही, कोणत्याही प्रकारची आर्थिक अपेक्षा ठेवत नाही किंवा तशी भेट इत्यादी स्वीकारत नाही.

४) बरेचदा शिष्यास, आपला गुरु तिरसट, रागीट, तुसडा वाटतो. ते बऱ्याचअंशी पूर्वनियोजित असते.

५) एक गुरु कधीही, गुरु म्हणून मान्यता पावलेल्या दुसऱ्या गुरूची निंदा किंवा मस्करी करत नाही.

६) गुरु हा प्रसिद्धीपासून लांब राहणारा, स्वतः किंवा आपला शिष्यसमुदाय किती मोठा वगैरे बोलण्याच्या भानगडीत पडत नाही.

अशी अनेक लक्षणे सांगता येतील. असो. गुरुशिष्य परंपरेत जसे शिष्याला तसे गुरूलाही काही नियमाचे पालन करावेच लागते. त्यापैकी बरेचसे नियम आदी शंकराचार्य ह्यांनी लिहिलेल्या मनीषा पंचाकम ह्या ग्रंथात आहेत. काही खाली देतोय

१) आपल्या शिष्यास काय आणि किती उपासना, कधी पेलेल,  ह्याचे भान गुरूस नेहमी ठेवावयास लागते. शिष्याच्या प्रगतीनुसार किंवा कुवतेनुसार त्यास योग्य मार्गावर पुढे पुढे ढकलावे लागते.

२) शिष्याचा योग्य हट्ट योग्य वेळी पुरवणे हे गुरुचे सगळ्यात आवडते कार्य पण ते तेवढेच सांभाळून करावे लागते.

३) गुरु आपल्या शिष्याचे कोणत्याही परिस्थितीत, केव्हाही आणि कधीही वाईट चिंतु शकत नाही. त्याची त्यास परवानगी नाही.

४) गुरु शिष्यास शाप देऊ शकतो पण त्या शापाचा उः शाप माहित असेल तरच…

५) गुरु आपल्या शिष्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू शकत नाही अगदी सेवेचीसुद्धा. आध्यात्मात गुरुदक्षिणा घेत नाहीत. ती शिक्षणात घेतात.

 वरील सर्व, आध्यात्मिक गुरूस लागू होते. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू इथे नाही. नकळत तसे माझ्याकडून घडल्यास मोठ्या मनाने माफ करावे.

No comments:

Post a Comment