Thursday, 21 December 2017

संत गाडगेबाबा

गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६ - २० डिसेंबर इ.स. १९५६) हे ईश्वर कशात आहे नेमकी जाणीव असलेले संतआणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.
"तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |"
असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
बालपणसंपादन करा
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगावयेथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे.त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले.
सामाजिक सुधारणासंपादन करा
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्यातोंडी गावकर्‍यांना शिकविला.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्‍न केले.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वर्‍हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली.
महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे - ‘या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली’ - असे म्हटले जाते. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणार्‍या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणार्‍या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे.
"संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश "संपादन करा

गाडगेबाबा यांचा नागपूर येथील पुतळा
1. भुकेलेल्यांना = अन्न
2. तहानलेल्यांना = पाणी
3. उघड्यानागड्यांना = वस्त्र
4. गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत
5. बेघरांना = आसरा
6. अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार
7. बेकारांना = रोजगार
8. पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय
9. गरीब तरुण-तरुणींचे = लग्न
10. दुःखी व निराशांना = हिंमत
11. गोरगरिबांना = शिक्षण
हाच आजचा रोकडा धर्म आहे ! हीच खरी भक्ती व जानबूझकर आहे .
संक्षिप्त चरित्रसंपादन करा
गाडगे महाराजांनी कीर्तनाद्वारे आपले लोकशिक्षणाचे कार्य ऋणमोचन (विदर्भ) या गावापासून सुरू केले.
ऋणमोचन येथे त्यांनी 'लक्ष्मीनारायणाचे' मंदिर बांधले.
१९०८ मध्ये पूर्णा नदीवर घाट बांधून घेतला.
१९२५- मुर्तिजापूर येथे गोरक्षण कार्य केले आणि धर्मशाळा व विद्यालय बांधले.
१९१७- पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाला बांधली.
"मी कुणाचा गुरू नाही व माझा कुणी शिष्य नाही" असे म्हणून त्यांनी कुठल्याही संप्रदायाला समर्थन देण्याचे नाकारले.
फेब्रुवारी ८, इ.स. १९५२ रोजी 'श्री गाडगेबाबा मिशन' स्थापन करून महाराष्ट्रभर शिक्षणसंथा व धर्मशाळा स्थापन केल्या.
गाडगे महाराज गोधडे महाराज म्हणून ओळखले जात होते.
१९३२ - ऋणमोचन येथील सदावर्त संत गाडगेबाबांनी सुरू केले.
गाडगे महाराजांनी कीर्तनांद्वारे लोकजागृतीचा मार्ग अवलंबला.
"गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते.त्यांचे जीवनावर देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही निघाला आहे. यातील "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गीत मन्ना डेयांनी गायले.[१]
आचार्य अत्रे गाडगेबाबांबद्दल म्हणतात 'सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात'
१९३१ वरवंडे येथे गाडगेबाबांच्या प्रबोधनातून पशुहत्या बंद झाली.
१९५४- गाडगेबाबांनी मुंबईत जे.जे. हॉस्पिटलच्या रोग्यांच्या नातेवाइकांना उतरण्यासाठी हॉस्पिटलजवळ धर्मशाळा बांधली.
गाडगेबाबांनी डॉ. पंजाबराव देशमुख, व कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या कार्यात मदत केली होती.
डॉ आंबेडकर त्यांना गुरुस्थानी मानत असत.
२० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे मृत्यू. गाडगेनगर, अमरावती येथे स्मारक आहे.
नाशिक येथील गॊदावरी नदीवरील पुलाला गाडगे महाराजांचे नाव दिले आहे.
श्री संत गाडगे महाराज धर्मशाळा ट्रस्ट हा गाडगे महाराजांनी बांधलेल्या धर्मशाळांची व्यवस्था पाहतो.

संत नामदेव

संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. त्यांचे आडनाव रेळेकर असे होते. ते मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी पंजाबी व व्रज भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबात त्यांच्या बासष्ट काव्यरचना समाविष्ट आहेत.
नामदेव हे ‘मराठी’तील पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले. नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होत. आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारा असा त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने केले.
दामाशेटी हे संत नामदेवांचे वडील व गोणाई त्यांची माता होती. दामाशेटींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट हे सात्त्विक प्रवृत्तीचे भगवद्भक्त होते. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी हे संत नामदेवांचे जन्म गाव होय. नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात, शके ११९२ (इ.स.१२७०)मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. संत नामदेवांना ८० वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांचे बालपण हे पंढरपुरात गेले. त्यांनी लहानपणापासूनच श्रीविठ्ठलाची अनन्यसाधारण भक्ती केली.
संत गोरा कुंभार यांच्याकडे, तेरढोकी येथे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, चोखामेळा, विसोबा खेचर आदी संतांचा मेळा जमला होता. याच प्रसंगी संत ज्ञानेश्वरांच्या विनंतीवरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते. या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले.
पत्‍नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्‍या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
संत नामदेवाची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत. संत नामदेवांना मराठी भाषेतील पहिले आत्मचरित्रकार व चरित्रकार मानले जाते. संत नामदेवांनी आदि, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वरांचे चरित्र सांगितले आहे.
संत ज्ञानेश्ववरांच्या भेटीनंतर (इ.स.१२९१) संत नामदेवांचे आयुष्य पालटले. अनेक संतांबरोबर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा केल्या. त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजेच विसोबा खेचर यांनी त्यांना ब्रह्मसाक्षात्कार घडवून आणला, असे म्हणतात. त्यांच्या कीर्तनांत अनेक सद्ग्रंथांचा उल्लेख असे. यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते. ‘नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग’- अशी त्यांची योग्यता होती. ’नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते.
भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर सुमारे ५० वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्राची भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम त्यांनी केले. पंजाबमधील शीख बांधवांना ते आपले वाटतात. शीख बांधव ‘नामदेव बाबा’ म्हणून त्यांचे गुणगान गातात. पंजाबातील ‘शबदकीर्तन’ व महाराष्ट्रातील ‘वारकरी कीर्तन’ यांत विलक्षण साम्य आहे. घुमान (पंजाब) येथे शीख बांधवानी त्यांचे मंदिर उभारले आहे. बहोरदास, लढ्ढा, विष्णुस्वामी, केशव कलाधारी हे त्यांचे पंजाबी शिष्य होत. राजस्थानातील शीख बांधवांनीही नामदेवाची मंदिरे उभारलेली आहेत. `संत शिरोमणी' असे यथार्थ संबोधन त्यांच्याबद्दल वापरले जाते.
भगवद्भक्तांच्या व साधु-संतांच्या चरण धुळीचा स्पर्श व्हावा म्हणून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी ‘पायरीचा दगड’ होण्यात त्यांनी धन्यता मानली. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. नक्की दिनांकाविषयी एकवाक्यता दिसून येत नाही. कालनिर्णय या दिनदर्शिकेत पुण्यतिथी दिनांक २४ जुलै असा दिलेला आढळतो.

नामदेवांसंबंधी साहित्य 
"लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥" पंढरीचा विठुराया संत नामदेवांच्या कालखंडात म्हणजे १३व्या शतकातही (नामदेवांचा जन्म शके ११९२ म्हणजे सन १२७०मधला ) उभ्या मर्‍हाटी प्रांतातील बहुजन समाजाचे आराध्य दैवत होतेच. त्याची भक्ती आणि स्तुती करणार्‍या संतांची परंपरा नामदेवांच्या आधी व नंतरही होतीच. पण तरीही नामदेव विठुरायावर आपल्या शब्दशस्त्रांनी प्रहार करत होते. ते वृत्तीने व कृतीनेही बंडखोर होते, हे खरेच, पण त्याहून महत्त्वाचे हे की, ईश्वरावर टीकेचे आसूड ओढल्याने आपण स्वजनांत व हरिभक्तांच्या मेळयात अप्रिय होऊ याची भीती त्यांना नव्हती. नामदेवांचे समकालीन संत ज्ञानेश्वर हेसुद्धा बंडखोरच. पण त्यांचे बंड तत्त्वज्ञानाशी हुज्जत घालणारे. त्यामुळेच साक्षात भगवान श्रीकृणांच्या मुखातून निर्माण झालेल्या व महर्षी व्यासांनी शब्दबद्ध केलेल्या गीतेतील तत्त्वज्ञान केवळ संस्कृत जाणणार्‍या मूठभर समाजापुरते मर्यादित राहू नये, म्हणून त्यांनी गीतेचे निरूपण प्राकृत मराठीत केले व ज्ञानेश्वरीला जन्म दिला. ही बंडखोरीच. पण नामदेवांची बंडखोरी वेगळी होती . त्यांनी विठ्ठलाच्या महतीलाच आव्हान दिले.
"लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय थोरपण मिरविसी व्यर्थ। खोटेपणा स्वार्थ कळों आलें॥ हिता अनहिता केले आपस्वार्थ। वचन यथार्थ बोल आतां॥"
"देवा तुज आम्हीं दिधलें थोरपण। पाहें हें वचन शोधूनियां॥ नसतां पतित कोण पुसे तूतें। सांदिस पडतें नाम तुझें॥"
साक्षात विठ्ठलाला असे खडसावणार्‍या नामदेवांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या रचना यांचा विचार करता त्यांना रुढ अर्थाने ' संत ' म्हणणे हा दांभिकपणा वाटेल. परंतु नामदेवांना ' संतशिरोमणी ' म्हटले गेले व त्यांना ज्ञानेश्वर, एकनाथ व तुकारामाच्या पंगतीत बसवण्यात आले, कारण त्यांची ईश्वरभक्ती केवळ भावनेपोटी वा भीतीपोटी नव्हे, तर तर्काच्या कसोटीवर तपासून घेतलेली होती. नामदेवांनी विठ्ठलभक्ती शिकवली, त्यांचा विठ्ठल या नावातील दैवी शक्तीवर विश्वासही असावा, पण ज्या भक्तीने अन्य संत व वारकरी यांनी विठ्ठल या देवाची पूजा बांधली आणि त्याच्या समोर शरणागती पत्करली, तसे करणे नामदेवांना मान्य नसावे. त्यामुळेच "पतितपावन नाम ऐकुनी आलों मी द्वारां। पतिपावन नव्हेसी म्हणुनी जातों माघारा॥"' या प्रसिद्ध अभंगाच्या अखेरच्या चरणात ते "नामा म्हणे देवा तुझें न लगे मज कांही"', हे सुद्धा स्पष्ट करतात. नामदेवांचे बंड केवळ त्यांच्या रचनांमध्ये नाही, तर त्यांच्या वर्तणुकीतूनही वारंवार दिसत राहते. संत ज्ञानेश्वरांचे ते समकालीन. त्यांनी एकत्र प्रवासही केला. ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर नामदेव पुढे ५४ वर्षे जगले. या काळात त्यांनी खचून न जाता पंजाबपर्यंत प्रवास केला व तिथे पंजाबी भाषा शिकून गुरु"खीत रचना केल्या. शिखांच्या पवित्र गुरु ग्रंथसाहेबात नामदेवांच्या ६२ रचनांचा समावेश असल्याचे पाहायला मिळते . ही नामदेवांची एक प्रकारची बंडखोरीच . नामदेव उत्तरेचा प्रवास करत होते, तेव्हा यवनांच्या आक्रमणांचा दररोज धोका होता. त्यांच्यासाठी हा नवखा प्रांत होता. मात्र तरीही न डगमगता त्यांनी मार्गक्रमणा केली व आपले ईप्सित कार्य संपवल्यावर ते पुन्हा महाराष्ट्रातही आले. हा पराक्रम करणे एखाद्या बंडखोरालाच शक्य होते.

देवाचे देवपण हे मनुष्याच्या दुबळेपणात, त्याच्या व्याधींमध्ये आणि त्याच्यावर कोसळणाऱ्या संकटांमुळे भयग्रस्त होणार्‍या त्याच्या मनात आहे, असा सिद्धान्त नामदेवांनी मांडला .
" रोग व्याधि पीडा जनांसी नसती। तरि कोण पुसती वैद्यालागी॥ ... नामा म्हणे विठो दैवें आलों घरा। नको लावूं दारा आम्हालागीं॥"
या अभंगात नामदेवांनी हाच सिद्धान्त मांडला आहे. माणसे माणसांवर चिडतात; त्यांच्याशी भांडणे उकरून काढतात; त्यांना बोल लावतात, पण देवाच्या बाबतीत असे कोणी करत नाही. आपल्या बाबतीत काही वाईट घडले, तरी त्याला कारण आपणच, मात्र चांगले झाले, तर ते देवाचे उपकार, असे मानण्याची प्रवृत्ती असते. नामदेव मात्र त्यातले नाहीत. त्यांचे विठ्ठलावर निस्सीम प्रेम तर आहेच, पण वेळ प्रसंगी ते देवालाही शेलक्या भाषेत दूषणे देण्यास मागे - पुढे पाहात नाहीत. प्रसंगी रस्त्यावरच्या भांडणांप्रमाणे हमरी - तुमरीवरही येतात. एका अभंगात ते चिडून देवाला म्हणतात,
"मुळीच मी जाणें तुझा ठेंगेपणा। काय नारायणा बोलशील॥ पुरे पुरे आता तुमचे आचार। मजशीं वेव्हार घालूं नको॥ लालुचाईंसाठीं मागे भाजीपाना। लाज नारायणा तुज नाहीं॥ नामा म्हणे काय सांगों तुझी कीर्ती। वा उगी फजिती करूं तुज॥"
नामदेवांचा जन्म पंढरपुरातलाच. त्यामुळे बालवयापासून तिथल्या विठ्ठलाशी त्यांची सलगी. कदाचित त्यामुळेच नामदेवांनी आपल्या रचनांत असे स्वातंत्र्य घेतले असेल का? पण इतर वेळी देवावर अतोनात प्रेम करणारे नामदेव जेव्हा त्याच्यावर चिडतात, त्याला कारणेही तशीच असावीत. कुठे काही अन्याय झालेला त्यांना दिसला आणि भगवंतांनी काहीच केले नाही, असे त्यांना वाटले की, नामदेवांची बंडखोर वृत्ती उफाळून यायची. दक्षिण मावळ प्रांतात पाण्याचे दुर्भिक्ष झाले, तेव्हा नामदेव चिडले. त्यांनी लिहिले,
" काय तुज देवा आले थोरपण। दाविशी कृपण उणें पुरें॥ पुरे आतां सांगों नको बा श्रीहरी। गोकुळाभीतरीं खेळ मांडी॥ हलाहल शांत करी तत्क्षण। अमृतजीवन नाम तुझें॥ तुझें नाम सर्व सदा गोपाळासी। नामा म्हणे यासी काय जालें॥"'
दुष्काळ संपेना आणि माणसांचे कष्टसुद्धा वाढतच चालले, तेव्हा नामदेव आणखी चिडले. कमरेवर हात ठेवून शांतपणे उभा राहिलेला विठुराया आता त्यांना चीड आणत होता. नामदेव त्या निर्गुणपणाच्या मूर्तीकडे पाहात लिहितात,
" निर्गुणपणाच्या घेसी अभिमाना। तुज नारायणा सोडी ना मी॥ काय तुझी भीड धरावी म्यां आतां। कृपाळू अनंता म्हणें ना मीं॥" नामदेवांचा राग असा होता. "कल्पतरुतळीं बैसलिया। कल्पिलें फळ न पाविजे॥ कामधेनु जरी दुभती। तरी उपवासी कां मरावें॥ उगे असा उगे असा। होणार ते होय जाणार तें जाय॥ नामा म्हणे केशवा काय तुझी भीड। संता महंतां देखतां सांगेन तुझी खोड॥"
हातात एकतारी आणि चिपळ्या घेऊन फिरतानाचे नामदेवांचे चित्र आपण नेहमीच पाहतो. पण या शांत दिसणार्‍या चेहऱ्याच्या आड एक बंडखोर दडला आहे, हे कोणास कसे कळावे? नामदेवांच्या साक्षात्‌ भगवंतांविरुद्धच्या सततच्या बंडाचे कारण तरी काय असावे? ते जन्माने शिंपी. म्हणजेच ब्राह्मण व तत्सम तत्कालीन उच्च व विद्याविभूषित समाजापेक्षा वेगळे. त्यांनी वेद-विद्येचे पाठ केले नाहीत, पण त्यांना समाजातील पीडितांची दुःखे ठाऊक होती. ईश्वरावर अंधश्रद्धा असणार्‍यांची लुबाडणूक आणि फसवणूक पंढरपुरातलेच बडवे करत असल्याचे त्यांनी पाहिले होते. अशा अंधश्रद्धेपासून जनतेला दूर करून त्यांना कर्मयोगाच्या मार्गाला लावण्याचा अंतस्थ हेतू नामदेवांच्या रचनांतील बंडखोरीत असावा. केशवसुतांनी "देव दानवा नरें निर्मिलें , हे मत लोका कळवूं द्या" असे लिहिले. नामदेव हे त्यांचेच पूर्वज असावेत. कारण त्यांनी केशवालाच लबाड म्हटले. "साचपण ब्रीद सोडवीन तुझ्या। आता केशिराजा पण हाचि॥ लबाड तूं देवा लबाड तूं देवा। लबाड तूं देवा ठावा आम्हां॥ काय मूर्खपणें सांगशिल गोष्टी। थोरपणें मोठीं पुरे आतां॥ नामा म्हणे काय खवळिसि आम्हां। लाज नाहीं तुम्हा कवणेविसीं॥" अशा बंडखोरीच्या रचना करतानाच नामदेव भक्तांना जी एक महत्त्वाची शिकवण देतात, ती कर्मयोगाची आहे . भगवान श्रीकृष्णांनी गीतेत अर्जुनाला कर्मयोगाची शिकवण दिली. तीच पुढे लोकमान्य टिळकांना भावली व त्यांनी गीतारहस्य म्हणजेच कर्मयोगशास्त्र विशद केले. नामदेव ज्ञानेश्वरांच्या संगतीत राहिले. त्यांनी नेमके हेच सांगितले.
"मीच माझा देव मीच माझा भक्त। मी माझा कृतार्थ सहज असे॥ बंध आणि मोक्ष मायेची कल्पना। पडली होती मना भ्रंती कैसी॥ विठ्ठले विचारें दाखविलें सुख। होते जे अशंख हरपले॥ नामा म्हणे सोय सांपडली निकी। जालो येकायेकी हरिचा दास॥"
हे मंथन करताना नामदेवांमधला बंडखोर शस्त्रे खाली टाकतो आणि तो देवाचरणी लीन होतो. त्यांची महती हीच आहे. नामदेवांच्या बंडाच्या कथा श्रवण केल्यानंतर हा अभंग अंतर्मुख करायला लावणारा आहे. नामदेवांची थोरवी आणि वैचारिक प्रगल्भता त्यातच आहे . याच भावातील एक अभंग असाः
"कांसवीची पिलीं राहती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय॥ जैसा जवळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥ तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥ नामा म्हणे सलगीनें करितों मी निकट । झणें मज वैकुंठ पद देसी ॥"
नामदेवांसंबंधी आख्यायिका
§  नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रगट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला.
§  कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.




चातुर्मास


आषाढी एकादशी पासून चातुर्मास प्रारंभ होतो. या चार मासात व्रतवैकल्ये करण्याचा प्रघात आहे. तसेच काही गोष्टी वर्ज्य कराव्यात व अनेक देवतांची उपासना आपल्या हातून व्हावी हा उद्देश आहे.
पृथ्वीवरील व्रज -तम, वाढल्याने या कालामधील सात्वीकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ रहावे असे शास्त्र सांगते.
तिथी
१ - आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून ( गुरु पौर्णिमा ) कार्तिक पौर्णिमापर्यंत ( त्रिपुरी पौर्णिमा ) या चार मासांच्या काळास चातुर्मास म्हणतात.
२- काळ आणि देवता - मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायण ही देवांची रात्र असून उत्तरायण ही त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायणास प्रारंभ होतो. म्हणजेच देवांची रात्र प्रारंभ होते. कर्कसंक्रांत आषाढ मासात येते. म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस शयनी एकादशी म्हणतात. कारण त्या दिवशी देव झोपी जातात. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात. म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. वस्तुतः दक्षिणायण सहा मासांचे असल्यामुळे रात्र ही तेवढीच असायला हवी, पण बोधिनी एकादशीपर्यंत चारच मास पूर्ण होतात. याचा अर्थ असा की एक त्रितीयांश रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्म देवाचे कार्य चालू असताना पालनकर्ता विष्णु निशिक्रिय असतो. म्हणून चातुर्मासास विष्णु शयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात क्षयन करतो, असे समजातात. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णु शयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.
३ - महत्त्व - देवांच्या या निद्राकालात असून प्रबळ होतात. आणि मानवाला त्रास देऊ लागतात. म्हणून असूरांपासून स्वतःचे सरंक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते.
अर्थ - प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणतेतरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सर्ध्व असे पातक लागते.
४ - वैशिष्ठ्ये - अ ) या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते. आ ) पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मासचे व्रत एकास्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला. इ ) मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी त्यास अनुसरुन कंद, वांगी, चिंचा, इ. खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितलेले आहे. ई ) परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रंपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. उ ) चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्ध करतात. ऊ ) चातुर्मासात सण आणि व्रते अधिक असण्याचे कारण “ श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या चार मासात ( चातुर्मासात ) पृथ्वीवर येणार्‍या लहरिंत तमोगुण अधिक असलेल्या यम लहरिंचे प्रमाण अधिक असते. त्यांना तोंड देता यावें; म्हणून सात्विकता वाढवणे आवश्यक असते. सण आणि व्रते यांद्वारे सात्विकता वाढत असल्याने चातुर्मासात जास्तीत जास्त सण आणि व्रते आहेत. संशोधनाद्वारे असे आढळून आले आहे की, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये स्त्रियांना गर्भाशयासंबंधी रोग चालू होतात किंवा वाढतात, असे आढळलेले आहे.
५ - व्रते - सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पर्णभोजन ( पानावर जेवण करणे, एक भोजन ( एक वेळेस जेवणे, अयाचित ( न मागता मिळेल तेवढे जेवणे ), एकवाढी ( एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे ), मिश्र भोजन ( सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे ) इत्यादी भोजन नियम करता येतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात ‘ धर्मे - पारणे ’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसर्‍या दिवशी उपवास असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात. देशपरत्वे चातुर्मासातसे विविध आचार असतात.
६ - वर्जावर्ज्य  
अ ) वर्ज - प्राण्यांच्या अस्थिंचा चुना, चर्म पात्रातले उदक, ईडलिंबू, महाळूंग, वैष्वदेव न झालेले आणि विष्णुला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोंची, वांगी, कलिंगड, बहुबिज, किंवा निर्बिज फळ, मूळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ. मंचकावर चयन. ऋतू कालावाचून स्त्रीरमण. परान्न. विवाह किंवा अन्य तस्सम कार्य चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी रहावे, असे धर्मसिंदूत आणि इतरही काही धर्मग्रंथात सांगितले आहे.
आ ) अवर्ज्य - चातुर्मासात हविष्यान्न सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, समुद्रातले मीठ, गाईचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी, इत्यादी पदार्थही हविष्ये जाणावीत. ( वर्ज्य पदार्थ रज - तमगुणयुक्त असतात. तर हविष्यांने सत्व गुणप्रधान असतात.
७ - तप्तमुद्रा - वैष्णवांनी आषाढी आणि कार्तिकी एकादशीस तप्तमुद्रा धारण कराव्या, असे रामार्चण चंद्रिकेत सांगितले आहेत. ( काही उपसंप्रदायांचे स्वामी मुद्रा उण करून त्याचा छाप दुसर्‍यांच्या शरीरावर मारतात, त्याला तप्तमुद्रा असे म्हणतात. ) तप्तमुद्रांविषयी प्रशंसापर विधीवाक्य आणि निंदापर निषेध वाक्यें पुष्कळ आढतात. तेव्हा त्या विषयी शिष्ठाचाराप्रमाणे व्यवस्था जाणावी, असे धर्मसिंधूकार म्हणतात.

Saturday, 16 December 2017

रुद्राक्ष


रुद्राक्षाच्या वृक्षालाच रुधिरवृक्ष असे म्हणतात. त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव 'एलिओकार्पस स्फेरिकस' असे आहे. हा सदाहरित वृक्ष हिमलयाच्या पायथ्याच्या डोंगराळ प्रदेशाच्या जंगलात आढळतो. साधारणतः समुद्रसपाटीपासून तीन हजार मीटर उंचीवर ही झाडे कपारित चांगली वाढतात. रुद्राक्षाचे झाड ८ ते १२ मीटर उंच असते. त्याची साल गडद करडी असते. या झाडाचे लाकूड, हलके, मजबूत व चिवट असते. फळ्या, खोकी, कपाटे बनवण्यास त्याचा उपयोग होतो. या झाडाची पाने चिंचेच्या किंवा गुंजेच्या पानासारखी पण टोकदार, थोडी, लांब असतात. या वृक्षाला पानांच्या बंगलेत लोंब्या येऊन पांढरीशुभ्र, मंद वासाची फुले येतात. एप्रिल ते जुलै या काळात या वृक्षाला बोराच्या आकाराची गोल, जांभळट रंगाची फळे येतात. या फळातील गर आंबट चवीचा पांढुरका व चिकट असतो. मेंदुचे विकार व अपस्माराचे झटके या विकारावर तो औषध म्हणून उपयोगी आहे. ही फळे झाडावर पिकून थंडीत खाली पडतात. आतील बी ला रुद्राक्ष म्हणतात. ती कठीण आवरणाची व नक्षीदार असते खर्‍या रुद्राक्षाला आरपार भोक असते. त्याला वाहिनी म्हणतात. रुद्राक्षाचा रंग तांबूस असतो आणि तो पक्का असतो. हा पाण्यात टाकल्यास सरळ खाली जातो. त्याच्यामध्ये चुंबकीय गुणधर्म असतात. टांगलेल्या स्थितीत ते दक्षिणोत्तर दिशा दाखवतात. त्यांना किड लागत नाही. रुद्राक्ष हातात धरला तर स्पंदने जाणवतात. उच्च रक्त दाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रुपात परिधान केला जातो. अध्यात्मात रुद्राक्षाला विशेष महत्त्व आहे. हिंदू, बौद्ध, शीख व मुस्लिम  धर्मामध्येही रुद्राक्ष पवित्र मानतात . कोणत्याही देवतेचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ वापरतात.
आजकाल खोटे रुद्राक्षही विकले जातात. भद्राक्ष व विकृताक्ष नावाची झाडे असतात. त्यांच्या बिया रुद्राक्षाच्या झाडांसारख्याच असतात. पण या बियांना भोक नसते. ते सुईने पाडले जाते. तसेच यांना काताच्या पाण्यात ठेवून त्यांना तांबूस रंग दिला जातो. त्यांमुळे असे खोटे रुद्राक्ष पाण्यात ठेवले तर त्याचा रंग धुतला जातो. हे खोटे रुद्राक्ष पाण्यावर तरंगतात. आणि त्यामध्ये चुंबकीय गुणधर्म नसतात. तेंव्हा रुद्राक्ष विकत घ्यायचा झाल्यास वरील गुणधर्म पाहूनच विकत घ्यावा. विशिष्ट रोग निवारण्यास रुद्राक्षाच्या माळा गळ्यात,दंडात, मनगटात, कमरेभोवती घालतात. रुद्राक्षावर पाणी ओतून ते पाणी पितात. काही वेळा आजार्‍याच्या उशी खालीही ठेवतात.रुद्राक्षाबद्दल काही समजुती पुढीलप्रमाणे ----
१.] एकमुखी रुद्राक्ष---  हि रुद्राक्ष दुर्मिळ असून शिवाचे रूप समजला जातो. हि ज्याच्याजवळ असेल त्याला शत्रू असत नाहीत. व त्याच्या घरात लक्ष्मी निरंतर वास करते असे म्हणतात.
२.] दोनमुखी रुद्राक्ष--- हा  रुद्राक्ष म्हणजे शंकर पार्वतीचे एकत्र रूप समजले जाते.
३.] तीनमुखी रुद्राक्ष---  अग्नीरूपात असलेला हा रुद्राक्ष धारण केल्यास कोणताही विकार होत नाही असे म्हणतात.
४.] चारमुखी रुद्राक्ष --- याच्या पूजनाने धनप्राप्ती होते व असलेला पैसा अस्थानी खर्च होत नाही असे म्हणतात.
५.] पाचमुखी रुद्राक्ष--- हा रुद्राक्ष काळाचा शत्रू असून याच्या पूजनाने अकाली मृत्यु येत नाही
६.] सहामुखी रुद्राक्ष--- कार्तिकेय स्वरूपात याची गणना केली जाते व तो शक्तीवर्धक समजला जातो.
७.] सप्तमुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने सर्व देवता प्रसन्न होतात.
८.] अष्टमुखी रुद्राक्ष--- याला गणेश रूप मानून कार्यसिद्धीसाठी याची पूजा केली जाते.
९.] नऊमुखी रुद्राक्ष--- काळभैरवाचे स्वरूप समजून बाधा, पीडा,टळावी म्हणून याची पूजा केली जाते.
१०.] दहामुखी रुद्राक्ष--- जनार्दन स्वरूपात याची गणना होते.
११.] अकरामुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने इंद्रदेवता व अकरा रूद्र प्रसन्न होतात.
१२.] बारामुखी रुद्राक्ष--- सूर्यस्वरूपी या रुद्राक्ष पूजनाने महाविष्णू प्रसन्न होतात.
१३.] तेरामुखी रुद्राक्ष--- याच्या पूजनाने सिद्धी प्राप्त होते.
१४.] चौदामुखी रुद्राक्ष--- रोगनिवारण होऊन इच्छा पूर्ती होण्यासाठी याची पूजा करतात.
१५.] पंधरावा गौरीशंकर रुद्राक्ष--- एकाच देठावर दोन मणी काही वेळा सापडतात,किंवा एकाच देठावर तीन रुद्राक्ष येतात, त्यांना ब्रम्हा, विष्णू, महेश किंवा दत्तस्वरूप समजले जाते. 

कुलदैवत

*कुलदैवत वेगवेगळे का ?*

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो

कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय?
आपले कुलदैवत कोठे आहे?
त्याचे महत्व काय?
कुलदैवतासंबंधी आपल काय कर्तव्य आहे?

हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. विभक्त्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उध्दभवली की धावपळ सुरु होते.

आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.

*कुलदेवता या शब्दाचा अर्थ !*

‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्री देवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते.

कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात आहेत.

*कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व*

ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

*कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?*

मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया
विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम
शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती
आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली
शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता – गणेश
देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)
वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही )

*नोट: कुलदेवी/देवता माहीती नसल्यास वरील पैकी ज्या देवावर भक्ति आहेत त्यांची उपासना करावी.*

या अजुन ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत वगैरे दैवतांचे प्रकार आहेत. (आराध्यदैवत असाही एक प्रकार असावा पण त्यात आणि इष्टदैवतात नेमका फरक कोणता ते माहित नाही.)

ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते.

एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे? (हे काहिसे आधी कोंबडी की अंडे सारखे झाले ना?) कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवणे

बहुदा कुळाचे एखादे दैवत असावे. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधणे

कुळ म्हणजे कुटुंबकबिला वाढला की म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.

कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. (दत्तक विधान अर्थातच यात मान्य आहे. अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे.) बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते.

कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात असे वाटते. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते.

आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे.

Friday, 15 December 2017

पंढरीची वारी

ज्ञानेश्वरीमध्ये 'वारी' म्हणजे येरझारा. वारकरी संप्रदायात पंढरीच्या वारीला नितान्त महत्त्व आहे. वर्षातून एकदा वारकर्‍याने पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घ्यावे; असा प्रघात आहे. गळ्यांत तुळशीमाळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि हातात टाळ मृदुंग अशा थाटात वारकरी वारीला जाताना दिसतात. पंढरपूरच्या वारीचा हा सोहळ. अभूतपूर्व असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे ते एक अंग आहे.

पुणे,सातारा,सोलापूर या तीन जिल्ह्यातून हा सोहळा चालतो. याचे नियोजन ज्ञानेश्वर संस्थानातर्फे केले जाते. दरवर्षी जेष्ठ वदय अष्टमीला आळंदीहून विधीपूर्वक पालखीचे प्रस्थान होते. आषाढ शुद्ध एकादशीला  पंढरपूरात तिचे आगमन होते. आषाढ पौर्णिमेपर्यंत पंढरपूरात माऊलीचा उत्सव असतो. आषाढ वद्य    एकादशीला पालखीचा परतीचा प्रवास सुरु होऊन आषाढ वदय दशमीला पालखी आळंदीला परत येते.

प्रत्येक मुक्कामात व सोहळ्याबरोबर पोलिस व होमगार्ड यांचा बंदोबस्त असतो. ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्यामार्फत सोहळ्याला विविध सोयी सुविधा पुरवल्या जातातच; पण सर्व ठिकाणी दानशूर मंडळी वारकर्‍यांना भोजन, शिधा, फराळाचे पदार्थ वाटत असतात. कोणी रहाण्या झोपण्याची व्यवस्था करतात. पूर्वी बैलगाड्या, घोडे, पायी असा हा प्रवास व्हायचा आता ट्रक, मोटारी यांचा समावेश झाला आहे. अर्थात वारकरी पायीच चालतो, शिधा, तंबू, गॅस, रॉकेल, झोपण्याचे साहित्य इ. सामान गाडीमध्ये असते.

वारीच्या मध्यभागी ज्ञानदेव माऊलीच्या चांदीच्या पादुका ठेवलेला रथ असतो. रथापुढे मानाच्या सत्तावीस दिंड्या असतात. मान्यता मिळालेल्या अन्य दिंड्या रथाच्या मागे असतात अर्थात पहिली दिंडी माऊलीची असते. भजन कीर्तन करीत वारकरी मार्गस्थ होत असतात. वारीची ही एक पदयात्राच असते तिचा मार्ग ठरलेला, मुक्काम ठरलेले असतात. ठराविक मुक्कामाच्या ठिकाणी, माऊलींच्या घोड्यांची रिंगणे होतात. पहिले उभे रिंगण 'चांदोबाचा लिंब' येथे, लोठांद- तरडगांव या मार्गावर होते. दुसरे गोल रिंगण ठाकूरबुवांच्या समाधीजवळ, भंडी -शेगाव या गावाजवळ खुड्रसफाटा येथे होते. वाखरी पंढरपूर या गावाजवळ शेवटची रिगणे होतात. वाटेत माऊलीच्या पादुकांना नीरा नदीत स्नान व पौर्णिमेला स्नानानंतर विट्ठल रखुमाई यांच्या चरणी भेट हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो.

पंढरीच्या वारीची वैशिष्ट्ये :-

१) दिंडी :- प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणेकरी एक पखवाज वादक असतो. दिंडीपुढे पताकाधारी वारकरी असतो. शिवाय डोक्यावर तुळशी वृंदावन किंवा पाण्याचा हंडा घेतलेल्या महिला व टाळकरी असतात. दिंडीमागून महिला वारकरी जातात. वीणेकरी हा दिंडीचा प्रमुख असतो. तो सांगेल त्याप्रमाणे भजने, हरीपाठ इत्यादिचे गायन करत टाळ मृंदुंगाच्या तालात नाचत वारकरी पुढे जातात

२) रिंगण- वारीला पायी जाताना येणारा थकवा जाण्यासाठी एकूण सहा ठिकाणी रिंगण घातली जातात.  खडे रिंगण व गोल रिंगण असे रिंगणाचे दोन प्रकार आहेत. खडे रिंगणाच्या वेळी माऊलीच्या दिंडीतील चोपदार वारकर्‍यांना दोन बाजुला उभे करून घोड्यांना पळण्यासाठी वाट करतात. माऊलीच्या घोड्यावर नुसतेच जीन टाकलेले असते. जरिपटक्याच्या अश्वावर चोपदार बसलेला असतो. त्याने इशारा करताच  दोन्ही घोडे दिंड्यांच्या शेवटपर्यंत पळत जतात व परत फिरून मध्यभागाच्या माऊलीच्या रथावर पाय टेकवून माऊलीच्या पादुकांवर मस्तक टेकवतात. मग त्या घोड्यांना हार, बुक्का, खारीक, खोबर्‍याचा प्रसाद व चारा मिळतो. फुगड्या, झिम्मा, "पुंडलीक वरदा हारी विट्ठल"चा गरज करत वारकरी नाचत असतात. गोल रिंगाणात चोपदार सर्व दिंड्यांना गोलाकार उभे करतात. पालखी मध्याभगी येईपर्यंत दिंड्यातील वारकरी विविध खेळ खेळतात.  पालखी मध्यभागी आली की सर्व पताकेवाले पालखीला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. रिंगणात फुगड्या झिम्मा आदि खेळ खेळतात. "ज्ञानोबा तुकाराम",  "पुंडलिक वरदा हारि विट्ठला"चा गजर करतात. एका घोड्यावर चोपदार हातात झेंडा घेऊन असतो. दुसरा घोडा माऊलीचा असतो.सेवक त्याला पालखीच्या ठिकाणी आणतो पालखीचे दर्शन घेऊन थोडे अंतर फिरवून  चोपदाराच्या घोड्यामागे घोडा सोडला जातो. त्याने धावत जाऊन चोपदाराच्या घोड्याला मागे टाकले की रिंगण पूर्ण होते. त्यानंतर सर्व दिड्यांतील टाळकरी, मृदुंगवाले, विणेकरी एकत्र येतात चोपदारच्या इशार्‍यावरून एकच ताल धरून एकाच सुरात गजर करतात. टाळकरी कधी बसतात. कधी उभे रहातात. कधी आडवे पडतात. मृदुंगवाले एका तालात सामुदायिकपणे  उडी घेतात. असे अनेक कर्यक्रम होऊन रिंगण संपते.

३) कीर्तन :- वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक संत नामदेव मानले जतात. यापद्धतीत इतर किर्तनासारखा पूर्वरंग, उत्तररंग, आख्यान असे काही नसते. या कीर्तनात सांप्रदायिक भजनाला प्राधान्य असते. कीर्तनात मृदुंग, टाळ, पखवाज व वीणा एवढी वाद्ये असतात. आणि देव, संत, नाममहात्म्य्,गुरुकृपा असेच विषय असतात. सुरवातीला मागे टाळकरी उभे राहून" सुंदर ते ध्यान" हा अभंग म्हणून कीर्तन सुरु  करतात. मग कीर्तनकार वीणा हातात घेऊन "रुप पाहता लोचनी" हा अभंग म्हणतात. नंतर वीणा विणेकर्‍याकडे देऊन निरुपणासाठी निवडलेला अभंग चालीवर गातात. टाळकरी त्यांना साथ देतात. अभंगाचे निरुपण विद्वत्तापूर्ण असते. मधूनमधून नामसंकीर्तन होत असते.

४) प्रदक्षिणा :- वारीला आलेला भक्त पंढरपुरातील विविध मंदिरे आणि पवित्र स्थाने  याचे दर्शन घेतो तीच प्रदक्षिणा. ही दोन प्रकारची असते. छोट्या प्रदक्षिणेस 'देव प्रदक्षिणा' म्हणतात. भक्त महाद्वार घाटापासून सुरुवात करतो.  नंतर तो पुंडलिक मंदिराकडे जातो. तेथून दत्तात्रेय, काळा मारुती ,चोपाळा यांचे दर्शन घेऊन शेवटी उद्धव घाटाची फेरी पूर्ण करतो. यात विट्ठल मंदिर  व त्याच्या वर्तुळाकार टप्यातील मंदिरे असतात. मोठ्या प्रदक्षिणेला 'नगर प्रदक्षिणा'असे म्हणतात. यासाठी भक्त आधी महाद्वार घाटापाशी चंद्रभागेत उतरतो, पुंडलिक मंदिराचे दर्शन घेतो. मग होडीतून विष्णूपद मंदिराकडे जातो. त्यानंतर नारद, अनंतपूर, गोपाळपूर, लखुबाई व अंबाबाई यांचे दर्शन करून महाद्वार घाटाकडे परत येतो.

वारकरी संप्रदाय

वारकरी संप्रदाय  हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा भक्तीसंप्रदाय नाही. तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सांस्कृतिक केंद्र आहे. या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्रीपुरुषांना खुले आहे. त्यात उच्चनीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. ब्राह्मणांपासून महारांपर्यंत सर्वांना सारखेच स्थान त्यात आहे. ईश्वरापुढे एक सामान्य माणूस, व नम्र भक्त म्हणूनच सर्वांनी वावरले पाहिजे; अशी त्यांची परंपरा आहे. त्यात ब्राह्मण, कुणबी,माळी शिंपी, सोनार, तेली, कुंभार, महार, असे  सर्व जातीचे लोक सामील झाले आहेतच  पण शेख महंमदासारखे मुसलमानी संतही वारकरी संप्रदायावर लुब्ध होते. वारकरी संप्रदायाने  शास्त्र प्रामाण्याला व जातिव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वतावरण निर्माण केले. बाह्य परिस्थीती ही  पूर्ण कर्मा नुसार प्राप्त होते; त्यात आपण बदल करु शकत नाही. पण भक्तीपंथाच्या सहाय्याने अध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापांचिक दु:खावर मात करता येईल असा विश्वास वारकरी पंथाने लोकांच्यात निर्माण केला. या संप्रदायातील लोकांनी जातिभेदा विरुद्ध लढा दिला नाही. जसा मनुष्यात काळा गोरा, उंच बुटका, सुंदर कुरुप असे भेद असतात तसाच एक जातिभेद हे त्यांनी गृहित धरले. त्यामुळे आपल्याला प्राप्त झालेल्या विशिष्ट जातीची बंधने पाळूनच अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग त्यांनी पत्करला. आणि धार्मिक ऐक्य साधले. लौकिक जीवनात आपल्या वाट्याला आलेली कर्तव्ये यथासांग पार पाडूनच वारकरी भक्तीमध्ये लीन होताना दिसतात.
           वारकरी संप्रदायात विठ्ठल भक्तीचा महीमा विशेष असला तरी राम, कृष्ण, दत्त, विष्णू, शिव इत्यादी देवतांच्या भक्तांना त्यांनी आपल्यात सामावून घेतले. विष्णू व शिव यांच्या ऐक्यावर भर दिला. स्वत: ज्ञानेश्वर गुरुपरंपरेने नाथपंथीय होते; तेव्हा त्यांच्या विचारसरणीवर नाथपंथातील तत्त्वज्ञानाचा ठसा आहे.. तसेच शांकरवेदान्त व  काश्मिरी शैवमत यांचेही संस्कार त्यांच्यावर होते. त्यामुळे शैवांची निष्ठा व तपश्चर्या त्यांनी स्वीकारली. वैष्णव संप्रदायातील सात्विकता, दयाशीलता, विश्वबंधुत्व इत्यादी गुण उचलले. द्वारकेचा कृष्ण आणि पंढरीचा विठ्ठल हेही शेजारील प्रदेशातून  आले. चक्रधर स्वामींनी गुजराथमधील भक्तीमार्गाचे संस्कार आणले. अशाप्रकारे उत्तर दक्षिण दिशांनी आलेल्या सार्‍या प्रवाहांना सामावून घेणारा असा हा वारकी संप्रदाय आहे. थोडक्यात उत्तर व दक्षिण भरतातील विविध प्रवृत्तीतील चांगल्या गोष्टींचा संगम होऊन तयार झालेली नवीन  संस्कृती म्हणजे वारकरी संप्रदाय.
वारकरी संप्रदाय व्रतवकल्याचे स्तोम नाही. कर्मठपणा नाही. तर त्याग, भोग, स्वधर्माचरण व नैष्कर्म्य यांचा मेळ घालण्याचा उपदेश त्यात आहे. अद्वैत, भक्ती, ज्ञान, उपासना, श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला. वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोकाभिमुख  होती. रात्रंदिवस लोकांत राहून बहुजन समाजात नवचैतन्य ओतण्याचा सफल प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला. वारकरी पंथाने ज्ञानाचे महत्त्व मान्य करुन भक्तीला अग्रस्थान दिले. व त्यासाठी नामसकीर्तना सारखे सोपे साधन लोकांपुढे ठेवले. परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यात जाण्याची व व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची आवश्यकता  नाही; हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिले. व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व समाजिक नितीमत्तेला पोषक अशी कर्मे करावीत; असे सांगून वारकरी संप्रदायाने प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला आहे. चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी हे सर्व वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल होते. आपापले व्यवसाय ते निर्वेधपणे करत, व लोकांत मिसळत  होते.
            वारकरी संप्रदायाने स्त्री व शूद्रांतील जडत्व नाहीसे करुन त्यांच्या जीवनात कार्य प्रवर्तक निष्ठा उत्पन्न केली.  त्यांच्या नीरस अशा जीवनात अध्यात्मज्ञानाची जोड मिळवून दिली. त्यामुळे आपल्यातील सुप्त शक्तींची व भावनांची जाणीव त्यांना झाली. प्राप्त परिस्थितीला कण़खरपणे सामोरे जाण्याच सामर्थ्य त्यांच्या मनात निर्माण झाले. मनुष्याचा मोठेपणा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर अवलंबून नसून वैयक्तिक चारित्र्यावर आहे ही गोष्ट वारकरी संप्रदायाने लोकांना पटवून दिली. वारकरी पंथाने विद्वत्तेचे अवडंबर माजवले नाही. निस्सीम भक्ती हाच या संप्रदायाचा आधार आहे. पण अंधभक्तीला मात्र  त्यांनी थारा दिला नाही. किर्तन, अभंग,गौळणी, ओव्या, भारुडे इत्यादी सुलभ साधनांनी त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहचविले. आत्मशुद्धी व सदाचार यावर वारकरी पंथाने भर दिला. निष्ठा, त्याग, धैर्य, सहिष्णूता, उदारता इत्यादी गोष्टींनी त्यांनी लोकांची मने जिकून घेतली. स्त्री व शूद्रांनाही या संप्रदायाने धर्ममंदिरात स्थान दिले.
           वारकरी संप्रदायाने मराठीचा अभिमान बाळगला. संस्कृतची कास धरली नाही. बोली भषेला वाड्मयीन प्रतिष्ठा मिळवून दिली. महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी प्रथम मराठीत लेखन केले ते वारकरी संप्रदायातील संतानी. देशभाषेत लिहिलेली ९ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी वारकरी पंथाला पायाभूत आहे. ती वाचायला सोपी, विस्तृत व स्फूर्तिदायक आहे. एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा या सारखे  ग्रंथलेखन वारकरी संतांनी केले. वारकरी संप्रदायातील या लेखकांनी लोकांची आवड निवड बरोबर ओळखली. आपल्या संप्रदायाच्या प्रचाराला नवे तंत्र वापरले. फुगड्या, पिंगा, भारुडे, गौळणी अभंग,  ओव्या, किर्तने अशा एक ना अनेक प्रकारांनी आपले विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले. नामदेव हे वारकरी संप्रदायाचे प्रचारक होते. नामसंकिर्तनाच्या तंद्रीत देहभान हरपून चंद्रभागेच्या वाळवंटात ते नाचू लागत. एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर हे सारेच वरकरी संत बहुजन समाजाशी समरस झाले व लोकांना रुचेल, समजेल अशा तर्‍हेचे लेखन त्यांनी केले. म्हणून त्यांच्या वाड्मयाला लोकप्रियता लाभली. निरुपणे, किर्तने यातून लोकात आत्मीयता व आत्मविश्वास निर्माण झाला. मग लोकांमधूनच अनेक धर्मप्रवक्ते, प्रचारक, कीर्तनकार निर्माण झाले. अध्यात्मविद्या केवळ ब्राह्मणांपुरताच मर्यादित राहिली नाही. जनाबाईसारखी मोलकरीणही अध्यात्माचे सिद्धांत अभंगात गाऊ लागली. आणि 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वहावा भार माथा | असे तुकारामांसारखा कुणबीही आत्मविश्वासाने म्हणू लागला.
वारकरी संप्रदायात प्रवेश करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. ज्याला वारकरी व्हायचे आहे. त्याने संप्रदायातील जेष्ठाकडे तुळशीमाळ घेऊन जायचे. तेथे गेल्यावर ती तुळशीमाळ ज्ञानदेवी, एकनाथी भागवत किंवा तुकाराम गाथा यापैकी कोणत्याही एका ग्रंथावर ठेवली जाते. आणि मग तीच माळ त्या वारकरी होण्याची इच्छा धरणार्‍याच्या गळ्यात घातली जाते. म्हणून त्यांना' माळकरी' असेही म्हणतात. ही तुळशीमाला तुळस या वनस्पतीच्या वाळलेल्या लाकडापासून मणी बनवून केलेली असते.त्यात सामान्य: २७, ५४, १०८ या संख्येने मणी असतात. नामजपासाठी तिचा वापर केला जातो.
वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का. पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो. प्रत्येक वारकर्‍याच्या कपाळावर बुक्का असतो. हा बुक्का दोन प्रकारचा असतो. कोळश्याची पूड, चंदनपूड, नागरमोथ्याची पावडर, बकुल फुल, दवणा, मरवा आदि वस्तूंपासून  काळा बुक्का तयार करतात तर कापूर, चंदन, दवणा, नाचणी, देवदार, लवंग, वेलची इत्यादी वस्तुंपासून पांढरा बुक्का तयार करतात.
वारकरी उपासनेचे तिसरे साधन म्हणजे गोपीचंदन. ही एकप्रकारची मुलतानी माती असते. त्वचेचे उष्ण्तेपासून रक्षण करण्यासाठी ती वापरतात. ज्या ज्या ठिकाणी बुक्का लावला जातो त्या त्या ठिकाणी गोपीचंदनाचे ठसे उमटवण्याची प्रथा वारकरी संप्रदायात आहे.
           वारकरी संप्रदायाचे चौथे साधन म्हणजे पताका. प्रत्येक वारकर्‍याच्या खांद्यावर ही पताका असते. गेरुच्या रंगात बुडवून तयार केलेले, जाड्याभरड्या कापडाचे,  विशिष्ट आकाराचे ते निशाण असते. वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत श्रीविठ्ठल. हे  श्री कृष्णाचे रुप आहे.. 'जय जय रामकृष्ण हरी'  हा वारकर्‍यांचा महामंत्र, तर "पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्रीगुरु ज्ञानदेव तुकाराम" हे वारकरी संप्रदायाचे घोषवाक्य आहे. ''जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल'' आणि  ''हरी मुखे म्हणा हरी मुखे | म्हणा पुण्याची गणना कोण करी |'' असा जयघोष हे वारकरी करत असतात.
            एकदा वारकरी संप्रदायात प्रवेश केला की काही पथ्य पाळावी लागतात जसे-- १) नेहमी सत्य बोलणे. २) धर्मपत्नी वगळून सर्व. स्त्रियांना मातेसमान मानणे.  ३) पापकर्मापासून दूर रहाण्यासाठी ईश्वराला प्रार्थना करणे. ४ ) पूर्ण शाकाहारी राहाणे. ५) वर्षातून एकदा पंढरपूरची यात्रा करणे. ६) एकादशीच्या दिवशी उपवास करणे. ७) रामकृष्ण हरी चा मंत्र जपणे. ८) संप्रदायाला मान्य असलेल्या ग्रंथाचे वाचन करणे. ९) ज्ञानदेवांच्या हरीपाठाचे वाचन करणे. १०) नित्य व्यवहार करत असताना विठोबाचे सतत स्मरण करणे इत्यादि.

Thursday, 14 December 2017

मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास .......


मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास.......

*प्रश्न : –  आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय ?*


 *असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात, त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो ?*

  *कृपया नक्की काय असते ?*


उत्तर :-

प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे.

यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात, आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ .

अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की , मेलेल्या व्यक्तिला संबोधुन मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पहात असतो. तेंव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहीलेला नाहि तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात. आता आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळुन टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात, जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ हातात घेऊन प्रेताला अपसव्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालतो , यावेळेस एका दगडाने खांद्यावरिल मडक्याला एक भोक पाडतात, अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात तेव्वा त्या माठाचा फ sss ट् असा आवाज होवुन तो फुटतो यालाच घटस्फोट असे म्हणतात. (आता नवरा जिवंत किवा बायको असतानाच घटस्फोट घेतला जातो) या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथुन जा. मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामधे बांधतात याला अश्मा असे म्हणतात. त्या नंतर प्रेताला जाळले जाते. आत्मा  हे सगळं पहात असतो , त्याला आपला देह जळताना पाहुन वाईट वाटते, त्याला रडायला येते , (येथे आशी कुणी शंका घेवु नये की आत्मा रडतो का ? तर आत्मा अजुनही चार कोषामधे बद्ध आहे व यात मनोमय कोष असल्यामुळे वासना, भावना असतात) प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो, तो आत्माही आपल्या सोबत घरी येतो मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात, दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो.

घरात दक्षिणेकडे कडे तोंड करुन दिवा लावला जातो याला नमस्कार करुन आलेली मंडळी निघुन जातात. घरातिल माणसं अंघोळ करुन पिठलं भात खायला मोकळी होतात ……..

पुढे काय होते …?

अश्मा घराबाहेर ठेवतात, आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघुन जातात व घरातील मंडळी पिठलं भात खावुन दुःख करित बसतात. पुढे अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर, गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे. लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे ती आपण पुढे पहाणार आहोत.

आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे, आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक, आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात कारण दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो.

त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक, मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पहात असतो, ऐकत असतो. आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं.

या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासकट करावं .

दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेवुन घाटावर जातात तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजे दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढावेत, या घाटावर जो विधि केला जातो तो म्हणजे काय असतो ? दहाव्या दिवशी ज्या अश्म्यावर आत्म्याचा वास असतो तो अश्मा घेवुन घाटावर येतात, क्षौर करतात आणि त्या आत्म्याला सद् गती मिळण्यासाठी संस्कार करतात , आता ते संस्कार म्हणजे काय करतात ते पुढे पाहु —-

एकाने शंका विचारली की क्षौर का करतात तर त्याचे उत्तर असे आहे की, जेव्हा आपण एखादे पुण्य कर्म करतो, एखादे व्रत करतो, अनुष्ठाण करतो तेंव्हा क्षौर करावे, कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्मे करावीत. आपण कळत नकळत दररोज अनेक प्रकारची पापं करत असतो आणि आपण केलेली पापे आपल्या देहात आपल्या केसाला धरून घट्ट बसतात म्हणून दर पौर्णिमेला व अमावास्येला प्रत्येकाने क्षौर करावे. अजुनही संन्यासी दर अमावस्या व पौर्णिमेला क्षौर करतात. पण आता केस वाढवायची फँशन आहे, एखाद्या प्रसिद्ध हिरोने डोक्याचा गोटा केला आणि दाढिमिशा भादरल्या की आमचे सगळे हिंदू तरूण आपलं डोकं भादरून मिशी काढून टाकतिल बाप जिवंत असताना सुद्धा .

थोडक्यात एका जीवाला सद् गती देणं हे सुद्धा पुण्य कर्मच आहे.

त्या मागचा दुसरा हेतु हा असतो की, गेलेल्या माणसा बद्दल ची कृतज्ञता, भावना, प्रेम मुंडण करून व्यक्त करण्याची प्रथा आहे. दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्याच्या शेजारी हा अश्मा ठेवतात व मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडामधे विलीन करतात आणि त्याना असे सांगितले जाते की तुमचा दैह जाळुन टाकला आहे, तुमच्या नावाने क्षौर केले आहे आता तुमचे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद् गतीला जा अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजुला नेवुन ठेवतात. जर त्या आत्म्याची वासना कशातच राहिली नसेल तर पटकन् कावळा त्या पिंडाला शिवतो अन्यथा तासंतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येवु देत नाही. कावळा आणि कुत्रा हे दोनच प्राणी असे आहेत की त्याना मृत्यू व आत्मा दिसतो म्हणून कुणी मरणार असेल तर तिथलि कुत्री भेसुर रडतात.

कावळा शिवल्या नंतर मग सगळे त्या अश्म्याला म्हणजे दगडाला अंगठ्या वरून पाणी देतात याला तर्पण असे म्हणतात……

    एकाने प्रश्न विचारला की, अंगठ्या वरूनच पाणी का देतात ?

त्याचे उत्तर असे आहे की, देवाला, ऋषी, आणि पितर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. आपल्या हाताची पाच बोटं आहेत त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट ज्याला तर्जनी म्हणतात, ही दोन बोटे पितरांकरता वापरावीत, मधले बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्या करता वापरावे, करंगळीच्या शेजारचे बोट आनामिका याने देवाला, गुरुंना, साधुसंताना गंध लावावे. म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे, ऋषींना तर्पण करताना करंगळी च्या बाजुने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे, आणि पितरांना अंगठ्याच्या बाजुने तिरपा हात करून पाणी द्यावे.

***

 एकाने विचारले एक शंका आहे, हल्ली च्या धावपळी च्या जिवनात समजा जर आपल्या अगदी जवळचे कोणी निवर्तले व सुतक असेल तर, सुतक असलेल्या व्यक्तिने सुतकात त्याचे व्यवसाय अथवा कार्यालयात जाऊन त्याचे कर्तव्य करणे जरूरीचे असेल तर त्याने करावे का ??? व त्या संदर्भात व या दरम्यान अन्नग्रहण करणे बाबत योग्य ते यम नियमांच्या बाबत मार्गदर्शन करावे ही विनंती.
शंका निरसन ——–

वरील शंका विचारली आहे त्याचे *उत्तर :-*

सुतकामधे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जावु नये, कुठल्याही देवळात जावु नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही. आपला जो नित्यनियम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडुन ईतर नामजप, कीर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही. नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र जाने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व दहा दिवस घराबाहेर पण जावु नये. सुतकामधे पलंग, गादीवर झोपु नये, चहा सोडुन कुठलेही गोड पदार्थ खावु नये, दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावु नये, अत्तर अथवा स्प्रे पर्फ्युम वापरू नये, नवीन वस्त्र परिधान करू नये, बाकी नित्याचे व्यवहार चालु ठेवावेत. दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी, सुतकातील सर्व कपडे धुवावेत, आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे. अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली गंध लावावे .

या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा, व तेराव्या दिवशीचे विधी करावेत .

चवदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नविन टोपी घालावी, खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जावुन गाभार्यात तुपाचे निरांजन लावुन ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व खांद्यावरील उपरणे तेथेच काढुन ठेवावे, लावलेले निरांजन घरी आणु नये.
*आधार : निर्णयसिंधु , गरुड पुराण*_
*आपण हिंदु आहोत, माहीती असावी म्हणुन हा प्रपंच.*

नमः शिवाय

नवनाथ कथासार परायण कसे करावे .

नवनाथ कथासार परायण कसे करावे ...
 
  • पारायण कसे करावे?
  •   पारायणाची पूर्वतयारी
  •   पारायणकाळात कसे वागावे?
  •   रोज किती अध्याय वाचावेत?
  •   स्त्रियांनी पारायण करावे का?
  •   पारायणकाळात कोणते नियम पाळावेत?
  •   पारायणकाळात काय खावे?
  •   पोथीबाबत काही नियम
  •   नवनाथांची मानसपूजा
  •   मानसपूजा कशी करावी?
  •   शुद्ध आचरणाची गरज
  •   पारायण सात दिवसांचेच का?
  •   दिव्य अनुभव कधी येतील?
  •   अनुभव का येतात?
  •   पारायणाचे दिव्य अनुभव
  •   पारायण कसे करावे?

श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण चाळीस अध्याय आहेत. या ग्रंथाचे पारायण नऊ दिवसात पूर्ण करावे. काही साधक या पद्धतीने पारायण न करता रोज ५ ते १०० ओव्या वाचतात. काहीजण रोज एक अध्याय वाचतात. तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एका विशिष्य फलप्राप्तीसाठी आहे. पूर्ण श्रद्धेने व भक्तीभावाने, तसेच नाथांना शरण जाऊन केलेल पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतात

पारायणाची पूर्वतयारी
'श्री नवनाथ भक्तिसार' ह्या ग्रंथाचे पारायण सुरू करण्यापूर्वी फुले, हार, तुळशी, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे इ. तसेच अष्टगंध, शक्य तर हीना अत्तरच, रांगोळी, नारळ इ. गोष्टी तयार ठेवाव्यात. नंतर शुद्धोदकाने स्नानकरून भस्मलेपन करावे. कलश स्थापन करावा. देवापुढे विड्याची पाने, सुपारी व दक्षिणा ठेवावी, तसेच नयनमनोहर सुंदर रांगोळी काढावी, समई लावावी. (ही समई म्हणजेच नंदादीप, सातही दिवस अखंड तेवत ठेवावी.) नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्यतर संध्या करून १०८ वेळा गायत्री जप करावा. एवढे झाल्यावर श्रीगणेश, श्रीकुलदैवत, आपले सद्गुरू त्याचप्रमाणे वडील मंडळींना साष्टांग वंदन करून त्यांचे शुभाशीर्वाद घ्यावे. नवनाथ पारायणासाठी सोवळे-ओवळ्याचे फारसे नियम नाहीत. शुभ्र धूत वस्त्र परिधान करून पारायण केले तरी चालते.
असो, या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करावे. (रोहिणी, उत्तरा, अश्विनी, पुष्, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा व रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात. या नंतर उजव्या तळहातावर उदक (पाणी) घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे. कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक असते. परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते. त्यामुळे फलाची प्राप्ती होत नाही. हा संकल्प पुढीलप्राणे उच्चारावा-
श्रीमम्नगणाधिपतये नम:। मातृपितृभ्यो नम:। इष्टदेवताभ्यो नम:। कुलदेवताभ्यो नम:। ग्रामदेवताभ्यो नम:। स्थानदेवताभ्यो नम:। सर्वेभ्यो देवेभ्यो नम:।सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नम:। एतत्कर्मप्रधान देवताभ्यो नम: ।ॐ तत्सत् श्रीमद्भगवते महापुरुषस्य विष्णूराज्ञ् या ।प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगचतुष्के कलियूगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणतीरे शालिवाहन शके... नाम संवत्सरे... अयने... ऋतो... मासे... पक्षे... तिथौ... वासरे... दिवस... नक्षत्रे.... योगे... करणे... राशिस्थिते वर्तमानचंद्रे... राशिस्थिते... श्रीसूर्ये... राशिस्थिते श्रीदेवगुरौ शेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानस्थितेषु सत्सु एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्तिथौ मम आत्मन: सकलशास्त्र पुराणोक्त फलप्राप्त्यर्थ असमाकं सहकुटुंबानं सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेमस्थैर्यायुरारोग्यैश्र्वर्यांभीवृद्यर्थ समस्ताभ्यूद्यार्थं चं श्रीनवनाथ भक्तिसार ग्रंथस्य पारायणं करिष्ये तदंगत्वेन पुस्तकरूपी श्रीनवनाथ पूजनं च करिष्ये । आसनादि कलश, शंख, घंटा, दीपपूजनं च करिष्ये। असे म्हणून हातातील उदक ताम्हनात सोडावे. नंतर संकल्पात म्हटल्याप्रमाणे आसन, न्यास, कलशपूजा तसेच शंख, घंटा, दीप यांची पूजा करून श्रीनवनाथ पोथीचीही प्रेभावाने भक्तीपूर्वक पूजा करावी व पोथी वाचनास प्रारंभ करावा. दुसऱ्यासाठी करावाचा संकल्प काही वेळा हे पारायण दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा फार मोठ्या संकटात सापडली असेल तर तिला स्वतःला हे पारायण करणे शक्य नसते. अशावेळी ते त्या व्यक्तीसाठी दुसऱ्या कुणाला करावे लागते. अशावेळी संकल्पाचा उच्चार कसा करावा असा प्रश्न कुणाला पडेल. त्यासाठी पुढीलप्रमाणे संकल्प सोडावा. 'अमुक गोत्रात्पन्ने, अमुक शर्मणा वृत्तोऽहं (स्त्री असेल तर अमुक नाम्ना वृत्तोऽहं) यजमानस्य (स्त्री असेल तर यजमान्याया) श्रीनवनाथ देवता प्रीतिद्वारा इष्ट कामना सिद्ध्यर्थं श्रीनवनाथ भक्तिसारग्रंथ पारायणं करिष्ये' इ. मात्र, संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाहेी करू नये. कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असा शास्त्रार्थ आहे. अगदी निष्काम भावनेने पारायण करावाचे असेल तेव्हाही 'श्रीनवनाथ देवता प्रीत्यर्थ' किंवा 'श्रीनवनाथ देवता कृपाप्रार्प्त्थं' असे म्हणावे. दुसरे महत्वाचे सांगावाचे म्हणजे, हे वाचन कधीही मनात करू नये, ते मोठ्यानेच करावे. त्यायोगे घरातील वातावरण शुद्ध बनते. बाधा किंवा पीडा दूर पळतात. (फक्त मंत्रजप मनात करावा.)

पारायणकाळात कसे वागावे?
पारायणकाळात कडकडीत ब्रह्मचर्य पाळावे. सत्य बोलावे व संपूर्ण दिवस श्रीदत्त व नवनाथ यांचे स्मरण करीत आनंदात घालवावा. वाचलेल्या भागातील नाथांचच्या लीलांचे स्मरण, चिंतन करावे. या काळात शक्यतर जास्तीत जास्त वेळ मौनच पाळावे. रोजचे वाचन झाल्यावर श्रीगणेश, श्रीशिव, श्रीदेवी, श्रीदत्त व श्रीनवनाथ यांच्या खड्या आवाजात आरत्या म्हणाव्यात, तसेच त्यांची निवडक स्तोत्रे सुंदर चालीत म्हणावीत.

रोज किती अध्याय वाचावेत?
पारायणकाळात रोज किती अध्याय वाचावेत या विषयी मतभेद आहेत. परंतु सर्वसाधारणतः पुढील प्रकारे वाचन केल्यास एकाच दिवशी जास्त वाचन करण्याचा ताण पडत नाही.
पहिल्या दिवशी १ ते ६ अध्याय
दुसऱ्या दिवशी ७ ते १२ अध्याय
तिसऱ्या दिवशी १३ ते १८ अध्याय
चौथ्या दिवशी १९ ते २४ अध्याय
पाचव्या दिवशी २५ ते ३० अध्याय
सहाव्या दिवशी ३१ ते ३६ अध्याय
सातव्या दिवशी ३७ ते ४० अध्याय
 रोजच्या वाचनानंतर आरती, प्रसादाबरोबरच शक्यतो देवापुढे धूप जाळावा. धूपामुळे दैवत जागृत राहते. तसेच धूपाच्या सुवासामुळे आपले मनही प्रसन्न राहण्यास मदत होते. देवाला हीना अत्तरही लावायला विसरू नये. पारायण पूर्ण झाल्यावर शिव किंवा दत्तात्रेय यांना अभिषेक करावा. तसेच ब्राह्मण व सुवासिनी (मेहूण) यांना भोजन, विडा व दक्षिणा देऊन तृप्त करावे.
स्त्रियांनी पारायण करावे का?

'श्री नवनाथ भक्तिसार' ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का?
असा प्रश्न पुष्कळदा विचारला जातो. याचे कारण, श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये अशी स्पष्ट आज्ञा प्रसिद्ध दत्तावतार श्रीवासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबेस्वामी महाराज यांनी आपल्या 'स्त्रीशिक्षा' या ग्रंथात दिली आहे. याचे कारण या ग्रंथात वेदाक्षरे आलेली आहेत, असे ते सांगतात. परंतु 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथात कुठेही वेदाक्षरे नसल्यामुळे हा ग्रंथ पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनीही वाचण्यास काहीच हरकत नाही. त्यायोगे त्यांचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

पारायणकाळात कोणते नियम पाळावेत?
'श्री नवनाथ भक्तिसार' या ग्रंथाचे पारायण करताना पाठकाने काही महत्वाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, तरच त्याला पारायणाचे अनुभव येतील. हे नियम पुढीलप्रमाणेः
१) वाचन स्नानोत्तर, अंगाला भस्मलेपन करूनच करावे. भस्म कपाळावर, दोन्ही दंडांवर, हृदयावर व
गुडघ्यांना लावावे व ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ 'ॐ नमः शिवाय' एवढेच म्हणावे.
२) वाचन मनात न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात करावे. यायोगे ध्वनिकंपने निर्माण होऊन वातावरण- शुद्ध होते.
३) रोजचे वाचन संपेपर्यंत मध्ये काहीही बोलू नये,
४) वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे. तो तो कथा प्रसंग डोळ्यापुढे उभा राहणे आवश्यक आहे,
५) सात दिवसांतच वाचन संपवावे, व या काळात देवापुढे अखण्ड नंदादीप तेवत ठेवावा.
६) या काळात (खरे तर नेहमीच!) सात्विकच अन्न सेवन करावे,
७) तसेच कडक ब्रह्मचर्य (कायिक, वाचिक व मानसिक) पाळावे,
८) या काळात 'ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः' या मंत्राचा जमेल तितका जप करावा.
९) पारायणकाळात बाहेरचे काहीही खाऊ-पिऊ नये. (खरे तर साधकाने हा नियम नेहमीच पाळावा!),
१०) या काळात अतत्त्वार्थ भाषण-शिव किंवा दत्त यांची स्तोत्रे म्हणावीत.
१२) रोजचे वाचन संपल्यावर नाथांची मानसपूजा करावी.
१३) काहींच्या मते पारायणकाळात नेहमीप्रमाणे पोथी बासनात बांधून ठेवू नये. झालेल्या अध्यायापर्यंत उघडीच ठेवावी.
१४) शक्यतो पूर्व वा पश्चिम दिशेस तोंड करून बसावे.
१५) या सात दिवसांत शक्यतो जमिनीवर चटई वा कांबळे टाकून डाव्याच कुशीवर झोपावे,
१६) पारायण संपल्यावर पोथीची पूजा करावी व सांगतेच्या दिवशी भोजनात भाजणीच्या पिठाचे वडे करावेत.
तसे नियम सांगायचे तर पुष्कळ आहेत, परंतु त्यातील अगदी महत्वाचे तेवढे येथे दिले आहेत.
साधकांनी आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी, ती अशी की, प्रत्येक पारायण केल्यावर काही दिव्य अनुभव येतीलच असे नाही. अनुभव येणे न येणे हे तुमचे मन व शरीर किती प्रमाणात शुद्ध झाले आहे व तुम्ही किती भक्तिभावाने व तळमळीने पारायण केले यावर अवलंबून आहे. सुरवातीची काही किंवा बरीच पारायणे मन व शरीर शुद्ध होण्यातच खर्ची पडतात, तर कित्येकदा तुमची वास्तू शुद्ध नसेल तर ती शुद्ध होण्यासाठी खर्ची पडतात. साधकांनी या गोष्टी नीट लक्षात ठेवून अनुभव येण्याची घाई करू नये. पारायण करावेसे वाटणे हा देखील एक अनुभवच आहे! कारण तशी बुद्धी देखील त्या दैवताच्या इच्छेशिवाय व कृपेशिवाय निर्माण होतच नाही!! कित्येक श्रीमंत लोक घरात ब्राह्मणाकडून पारायणे करून घेतात. काहींच्या घरात ब्राह्मणांकडून वर्षभर 'सप्तशती' चे पाठ सुरू असतात. अर्थात त्याचाही त्यांना फायदा होतो. फक्त अशा पाठांच्या वेळी तो श्रवण करण्याचे पथ्य त्यांनी अवश्य पाळावे. नाहीतर इकडे ब्राह्मण पाठ करतो आहे आणि शेठजी टी.व्ही. वरील फिल्मी गीतांची मजा लुटताहेत असे होऊ नये!

पारायणकाळात काय खावे?
पारायणकाळात अर्थातच शुद्ध व सात्त्विक अन्न घ्यावे हे वेगळे सांगायला नकोच. या काळात कांदा, लसूण पूर्ण वर्ज्य आहे. तसेच, 'अधिकस्य अधिकं फलं' या न्यायाने या काळात सोवळ्यात केलेला स्वयंपाक सर्वात उत्तम. तसेच, बाहेरचे सर्व पदार्थ वर्ज्य. बाहेर पाणीदेखील न घेणे उत्तम! (हे नियम खर्या साधकाने खरे तर कायमच पाळावेत. तथापि, ते न जमले तर निदान पारायणकाळात तरी अवश्य पाळावेत.) खरे तर शरीराला एका विशिष्य पद्धतीने राहण्याचे 'वळण लागावे' यासाठी देखील अधूनमधून पारायणे करावयाची असतात! असो. काहीजण या काळात हविष्यान्न खाऊन राहतात. कारण हे अन्न सर्वांत सात्त्विक समजले आहे.
'धर्मसिंधु' या सर्वमान्य ग्रंथात पुढील पदार्थांचा हविष्यान्न म्हणून उल्लेख आहे- साळीचे तांदूळ, जव, मूग, तीळ, राळे, वाटाणे इ. धान्ये. पांढरा मुळा, सुरण इ. कंद, सैंधव व समुद्रोत्पन्न अशी लवणे, गाईचे दूध, दही व तूप. तसेच फणस, आंबा, नारळ, केळे, रायआवळे ही फळे, त्याचप्रमाणे जिरे, सुंठ व साखर, काहींच्या मते, दूधभात, साखर गव्हाची पोळी, तूप चालेल. मीठ, तिखट, आंबट नको. गूळही नको. अर्थात ज्यांना हे पाळणे शक्य आहे अशांसाठीच ही माहिती येथे दिली आहे. ज्यांना एवढे काटेकोर नियम पाळता येणार नाहीत अशांनी पारायणकाळात शुद्ध सात्त्विक अन्न घेण्यास हरकत नाही.

पोथीबाबत काही नियम
आता 'श्रीनवनाथ भक्तिसार' ह्या पोथीचे पारायण करू इच्छिणार्या पाठकांना या पोथीच्या संदर्भात काही सूचना अवश्य या द्याव्याशा वाटतात. त्या अशा-
१) ही पोथी एक अत्यंत पवित्र वस्तू समजून ती शक्यतो रेशमी कापडात बांधून पवित्र जागी ठेवावी.
२) पोथीचे पारायण करताना पाने उलटण्यासाठी बोटाला थुंकी लावून पाने कधीही उलटू नयेत. (हा नियम अन्य ग्रंथांची पाने उलटतानाही खरे तर अवश्य पाळावा.)
३) रोजचे पारायण संपल्यावर पोथीवर फूल वाहण्यास विसरू नये. तत्पूर्वी पोथी कपाळी लावून तिला  नम्रभावाने वंदन करावे.
४) आरती झाल्यावर पोथी वरूनही नीरांजन ओवाळावे व उदबत्ती दाखवावी.
५) पोथीच्या रूपात नाथांचेच वास्तव्य घरात आहे असे समजून तिची काळजीपूर्वक जपणूक करावी.

मानसपूजा
या पाठांचा अनुभव लवकर यावा यासाठी एक प्रभावी उपाय साधकांना सुचवावासा वाटतो. तो म्हणजे 'मानसपूजा'. मानसपूजेत त्या त्या दैवतांचा संबंधसाक्षात मनाशी जोडला जात असल्याने व मन हे शरीरापेक्षा सूक्ष्म असल्याने आपण त्या दैवताच्या निकट लवकर जातो. या संदर्भात महर्षी रमण यांना भेटलेल्या एका वृद्ध स्त्रीची गोष्ट या ठिकाणी मुद्दाम सांगावीशी वाटते.
एकदा महर्षी रमण यांच्या दर्शनासाठी दोन वृद्ध स्त्रिया आल्या. नमस्कार-चमत्कार झाल्यावर त्यातल्या एका वृद्ध स्त्रीने महर्षींना नम्र स्वरात म्हटले, 'महाराज, मी त्यांची कळवळून प्रार्थनाही करते. परंतु माझी इच्छा अद्याप पूर्ण होत नाही.' त्यावर महर्षी क्षणभर विचारमग्न होऊन मग म्हणाले, 'तुम्ही उद्यापासून भगवंताची मानसपूजा सुरू करा आणि मला तीन महिन्यांनी पुन्हा भेटा. 'महर्षींचा निरोप घेऊन ती वृद्धा आनंदाने तेथून निघून गेली. त्यानंतर तीन महिने उलटले आणि ती अतिशय तृप्त अंतःकरणाने पुन्हा महर्षींकडे आली आणि त्यांना वदन करीत म्हणाली, 'महाराज, माझे काम झाले! भगवंतांनी मला साक्षात दर्शन दिले!!' मानसपूजेचा महिमा असा आहे!

मानसपूजा कशी करावी?
'श्री नवनाथ' पोथीचे आपले रोजचे पारायण पूर्ण झाल्यावर त्याच आसनावर डोळे बंद करून बसावे व डोळ्यापुढे कोणत्याही एका (आपल्या जास्त आवडणार्या) नाथांची मूर्ती आणावी. मात्र ही मूर्ती दगडी नसावी तर जिवंत स्वरूपातील असावी. त्यानंतर त्यांना नम्रभावाने मनानेच वंदन करून आपण एरवी करतो तशीच पूजा परंतु मनाने करण्यास सुरुवात करावी. पूजेचे सर्व उपचार मनानेच करावयाचे असल्याने पूजेसाठी सोन्या-चांदीची उपकरणे किंवा रत्नजडीत समयाही सहजपणे वापरता येतील! ही पूजा सुरू असताना 'ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः' किंवा 'ॐ चैतन्य जालंदरनाथाय नमः' इ. कोणताही मंत्र (आपल्या आवडीनुसार) सतत मनामध्ये सुरू असावा. त्यामुळे चित्त अन्यत्र जात नाही व एकाग्रता साधण्यास मदत होते. या पूजेच्या वेळी नाथांना शुद्धोदकाने स्नान घालावे, भस्म आणि गंध लावावे. गळ्यात हात घालावा, मस्तकावर व पायांवर फुले वाहावीत. उदबत्ती लावावी, धूप दाखवावा आणि विनम्रभावाने वंदन करावे. नंतर नैवेद्य दाखवून त्यांची आरती करावी. त्यांच्या पायावर डोके ठेवून त्यांची कृपा होण्यासाठी प्रार्थना करावी. (इतरही काही मागणे असल्यास ते मागावे) हे सर्व झाल्यावर ती पूजा मनानेच विसर्जित करावी व डोळे उघडावेत. मानसपूजा दैवताच्या जवळ लवकर नेते. त्यामुळे तिचे महत्त्व विशेष आहे. या मानसपूजेला वेळही कमी लागतो व ती कोणत्याही साधनांशिवाय व कुठेहीकरता येते.

शुद्ध आचरणाची गरज
तथापि, नाथांच्याकृपेसाठी व प्रसन्नतेसाठी केवळ ऐवढेच करून भागणार नाही. पारायणकर्त्याने आपले नेहमीचे दैनंदिन आचरणही शुद्ध व अत्यंत निर्मळ ठेवले पाहिजे. त्याचे आहारावर काटेकोर नियंत्रण असले पाहिजे. खर्या साधकाने शक्यतो बाहेरचे (परान्न) खाऊच नये हे उत्तम. कारण त्या अन्नावर कोणते संस्कार झालेले असतील हे सांगता येत नाही. परंतु आजकाल बाहेरचे आयतेच पदार्थ घरी आणून खाण्याची तरुण-तरुणींना एक चटकच लागली आहे. ज्यांना साधना करून काही प्राप्त करून घ्यावयाचे आहे त्यांनी तरी काही नियम हे कटाक्षाने पाळायलाच हवेत. त्याशिवाय त्यांना साधनेतले दिव्य अनुभव प्राप्त होणे कदापिही शक्य नाही!
साधकाने दुसर्याला लुबाडणे, फसविणे, या गोष्टीही टाळायलाच हव्यात. 'आम्ही एवढी पारायणे केलीत परंतु आम्हाला दैवी दृष्टांत एकदाही झाला नाही' अशी वारंवार तक्रार करणार्या पाठकांनी थोडे अंतर्मुख होऊन आले काय चुकते आहे याचा शोध कठोरपणे घ्यायला हवा आणि मगच दृष्टान्त वगैरेची अपेक्षा करायला हवी! आचारः प्रथमो धर्मः ओघानेच आले म्हणून शरीर व मन:शुद्धीच्या संदर्भात आणखी दोन शब्द सांगावेसे वाटतात. आमचा हिंदुधर्म हा आचारप्रधान आहे. 'आचारःप्रथमो धर्मः' हे वाक्य सर्वांच्या परिचयाचेच आहे. हा आचार शरीराच्या व मनाच्या शुद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
मन:शुद्धी ही शरीरशुद्धीवर अवलंबून आहे व शरीरशुद्धीसाठी अन्नशुद्धी महत्वाची आहे. 'आहारशुद्धो सत्त्वशुद्धिः' असे शास्त्रवचन आहे. परंतु शुद्धी म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे हे विसरता कामा नये. या शुद्धीत स्वच्छतेबरोबरच पवित्रता अपेक्षित आहे. साबणाने शरीर स्वच्छ होईल परंतु पवित्र होणार नाही. खर्या पवित्रतेसाठी आचार, विचार, उच्चार व आहार शुद्ध ठेवणे आवश्यक आहे, व यासाठी प्राणायाम, उपासना व शुद्ध सात्त्विक आहार या गोष्टी महत्वाच्या आहेत. यायोगे प्राण व मानसद्रव्याची शुद्धी झाली तर ज्ञानेश्वरीच्या ६ व्या अध्यायात म्हटल्याप्रमाणे शरीरातील पंचभूतांपैकी पृथ्वी व आप या तत्त्वांचे अंश कमी होतात व शरीर हलके होऊन योग्याला आकाशगमनादी सिद्धी प्राप्त होते. याच ठिकाणी साधकांनी, 'देवतानां तु सान्निध्यं अर्चकस्य तपोबलात्' हे शास्त्रवचनही लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे, अर्चकाच्या तपोबलावर प्रतिमेत देवतांचे सान्निध्य अवलंबून असते. यासाठीच देवदेवतांची कृपा व सान्निध्य हवे असेल तर साधकाने अंतर्बाह्य शुचित्व पाळले पाहिजे. आमच्या धर्मशास्त्रात परान्न न घेणे, त्याचप्रमाणे सोवळे- ओवळे पाळणे इ. नियम याच दूरदृष्टीने सांगितलेले आहेत. परंतु त्यांनाच आम्ही सांप्रत 'अंधश्रद्धा' म्हणू लागलो आहोत यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती?
पारायण सात दिवसांचेच का?
पुष्कळ लोक असा प्रश्न विचारतात की, 'श्रीगुरुचरित्र' किंवा 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथांचे पारायण सात दिवसांतच का करावे? आम्ही रोज थोड्या ओव्या वाचल्या तर चालणार नाही का?
या प्रश्नाचे उत्तर असे की, रोज थोड्या ओव्या वाचण्यात गैर काहीच नाही. 'अकरणात मंद करणं
श्रेयाः'  ही म्हण प्रसिद्धच आहे. परंतु सात दिवसांच्या पारायणाचे महत्व काही वेगळेच आहे. ते एक दिवसाच्या किंवा तीन दिवसांच्या पारायणाला येणे शक्य नाही. या संदर्भात तासगावचे (कै.) रा. वि. कुलकर्णी ऊर्फ 'आनंदघनराम' यांनी दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे. ते लिहितात- 'नुसत्या पारायणापेक्षा सप्ताहाच्या अनुष्ठानात काही विशिष्य हेतू असतात. १) 'संकल्प कर्मनिश्चयः' याप्रमाणे
कार्यपूर्तीला आपला मनोनिश्चय मदत करतो. हा इतका निश्चय नुसत्या पारायणात असत नाही. २) सप्ताहात जो व्रतस्थपणा असतो, तो नित्याच्या पारायणात कोणी पाळीत नसतात. व्रतस्थपणे राहिल्याने एक प्रकारची शक्ती उत्पन्न होते. ३) सप्ताहात बहुधा दिवसाचा सर्व वेळ त्यातच खर्ची पडतो. तसा नित्याच्या पारायणात फारच थोडावेळ त्या कार्यात व बाकीचा आपल्या संसारात जातो... (तसेच वार सात आहेत, वर्ण म्हणजे प्रकाशवर्ण (रंग) हेही सातच आहेत, व्याहृती सातच आहेत, पाताळे सात व स्वर्गही सात आहेत...)' -श्रीआनंदघनराम यांनी केलेला हा खुलासा कुणालाही पटण्यासारखाच आहे. यासाठीच एक किंवा तीन दिवसांचे पारायण केवळ नाइलाज किंवा वेळेअभावी करण्यास हरकत नाही. तथापि अशा पारायणात खरे तर मनाची एकाग्रता नीट सांभाळता येत नाही. कारण शरीराला तशी सवय नसते. (त्यामुळे एक दिवसाचे पारायण करताना शरीराला ताण येतो व काही वेळा तर केव्हा हे पारायण संपते असा विचारही मनात येऊन जातो!) यासाठीच सप्ताह पद्धतीने वाचन करणे हाच उत्तम मार्ग होय.

दिव्य अनुभव कधी येतील?
  'श्रीगुरुचरित्र' किंवा 'श्रीनवनाथ भक्तिसार' अशासारख्या ग्रंथांची भक्तिभावाने पारायणे करणार्या साधकांना काही वेळा अनेक दिव्य अनुभव आल्याचे दाखले आहेत. यामध्ये नवनाथांचे किंवा एखाद्या नाथांचे दर्शन होणे, त्यांच्याकडून काही संदेश मिळणे किंवा पारायण काही विशिष्य हेतूने केलेले असेल तर त्या संदर्भात काही सूचना मिळणे, याचप्रमाणे वृत्ती पूर्ण आनंदमय होणे, सुवास येणे, स्वर्गीय नाद ऐकू येणे इथपासून 'आदेश' किंवा 'अलख्'यासारखे शब्द ऐकू येणे इ, अनेकानेक अनुभवांचा उल्लेख करावा लागेल. प्रस्तुत लेखकाला यापैकी बरेच अनुभव आलेले आहेत. तथापि, असे आध्यात्मिक अनुभव दुसर्याला सांगू नयेत असा दण्डक असल्याने त्याबद्दल जास्त काही लिहिता येत नाही. (फक्त असे अनुभव निश्चितपणे येतात व अनुभव येतात ही कपोलकल्पित कथा नव्हे, हे ठामपणे सांगण्यासाठीच
अनुभव आल्याचे सांगितले आहे.)

अनुभव का येतात?
आता हे अनुभव कुणाला येतील व ते का येतात त्याबद्दल माहिती पाहू. हे अशाप्रकारचे दिव्य अनुभव अर्थातच पूर्वी सांगितल्याप्रमाणे शरीर व मनाची शुद्धी झाल्यावरच येतील यात शंका नाही. तोपर्यंतची पारायणे या गोष्टींच्या पूर्ततेसाठीच होतील. यासाठीच, पाठकांनी अनुभवांची घाई करू नये. फळ पक्क झाल्यावर झाडावरून आपोआप गळणारच आहे, अगदी त्याचप्रमाणे शरीर व मन एका विशिष्य पातळीपर्यंत शुद्ध झाल्यानंतर दिव्य अनुभव न मागताही आपोआप येणार आहेत! अर्थात, त्यासाठी आणखीही काही नियम पाठकांनी पाळणे आवश्यक आहे. पहिला महत्वाचा नियम म्हणजे वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हायला हवे. ही एकाग्रता इतकी असावी की, कथाप्रसंगाशी पूर्ण एकरूप झाल्यामुळे तो तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडतो आहे असे वाटले पाहिजे. दुसरा महत्वाचा नियम म्हणजे हे वाचन पूर्ण भक्तिभावाने व्हायला हवे. हे दोन नियम फार महत्वाचे आहेत. वरवर पाहता ते सोपे वाटले तरी ते अमलात येणे फार अवघड आहे! पारायण्याचे दिव्य अनुभव 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथाच्या पारायणाचे साधकांना अनेकदा दिव्य अनुभव येतात. ही पारायणे सकाम व निष्काम अशा दोन्ही पद्धतीने केली जातात. मात्र खर्या साधकाने ती निष्काम भावनेने करणेच अधिक योग्य ठरेल. ती तशी केल्यास अनेकदा स्वप्नात नाथांचे दर्शन घडते आणि मन आनंदी व शांत बनून साधक कृतकृत्य होतो!
प्रस्तुत लेखकाने अशा निष्काम भावनेने या ग्रथांची कितीतरी पारायणे आजवर केली असून थोडा आत्मस्तुतीचा दोष पत्करून एकच अनुभव सांगावासा वाटतो. १९६९ साली सदर पोथीचे निष्काम भावनेने एक पारायण केल्यानंतर एक दिवस पहाटेच्या सुमारास प्रस्तुत लेखकाला स्वप्नामध्ये दोघा नाथांचे दर्शन घडले. त्यापैकी एक नाथ उंचीने कमी होते, तर दुसरे त्यांच्यापेक्षा बरेच उंच होते. हे बहुधा मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथच असावेत. नंतर त्यापैकी जे उंच होते त्यांनी प्रस्तुत लेखकाला खाली बसविले व त्याच्या टाळूवर फुंकर मारली आणि दुसर्याच क्षणी दोघेही अदृश्य झाले. हा काही अनुग्रहाचाच प्रकार
असावा असे प्रस्तुत लेखकाला वाटते व त्याबद्दल तो स्वतःला भाग्यवान समजतो. (विशेष म्हणजे या घटनेनंतर एका आठवड्यात पूज्य श्री गुळवणीमहाराजांकडून प्रस्तुत लेखकाला शक्तिपात दीक्षा प्राप्त झाली.) असो, सकाम भावनेने या ग्रंथाची पारायणे केल्यासही असेच आश्चर्यकारक अनुभव येतात हे सुरवातीला सांगितलेच. विशेषतः या ग्रंथांतील २८ व्या अध्यायच्या नित्य पारायणामुळे अनेक अविवाहित तरुण-तरुणींचे विवाह जमल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांचे विवाह जमण्यात बरेच अडथळे येत होते. परंतु रोज न चुकता पूर्ण श्रद्धेने या अध्यायाचे एक पारायण सुरू केल्यानंतर एक महिना ते एक वर्ष या मुदतीत त्यांचे विवाह झाले! 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथाच्या चाळीसाव्या अध्यायात त्यातील प्रत्येक आध्याय कोणत्या कार्यासाठी वाचावा याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये
२८ व्या अध्यायाविषयी
लिहिताना मालू कवी म्हणतात-
'अठ्ठाविसाव्या अध्यायात।पिंगले करितास्मशानात।
विरक्त होऊनि भर्तरीनाथ। पूर्ण तपआचरला ।
तो अध्याय करिता श्रवण पठण। त्याभाविकांचे होईल लग्न।
कांता लाभेल गुणवान। सदा रत सेवेसी॥'
अर्थात या अध्यायाच्या पठणामुळे मुलांना जशी गुणवान कांता मिळते त्याचप्रमाणे मुलींनाही गुणवान पती लाभतो यात मुळीच संशय नाही. प्रस्तुत लेखकाच्या संग्रही या उपासनेमुळे विवाह जमल्याची अनेक उदाहरणे आहेत.
अठ्ठाविसाव्या अध्यायाप्रमाणेच या ग्रंथांच्या ५ व्या अध्यायाचे घरात नित्य पठण केल्यास घरातील बाधा किंवा पिशाच्चपीडा दूर होते यात मुळीच संशय नाही. मध्यंतरी एके ठिकाणी असे वाचण्यात आले की ज्यांच्या पत्रिकेत कालसर्पयोग आहे अशांनीही हा अध्याय रोज वाचल्यास हा दोष कालांतराने दूर होतो. इतर अध्यायांच्या पठणाचेही ४० व्या अध्यायात सांगितलेल्या फलश्रुतीनुसार फारच आश्चर्यकारक अनुभव येताना दिसतात. एक दिवस परगावच्या एका वकिलांचे प्रस्तुत लेखकास एक पत्र आले. त्या पत्रात त्यांनी लिहिले होते की, 'दोन वर्षांपूर्वी माझा व्यवसाय फार उत्तम प्रकारे चालला होता व महिन्याकाठी मला भरपूर पैसे मिळत होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून माझी नेहमीची गिर्हाईकेही माझ्याकडे न येता माझ्या समोरच्या वकिलांकडे जातात. हे असेच चालू राहिले तर लवकरच व्यवसाय बंद करून पोटासाठी कुठेतरी नोकरी पत्करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. तरी आपण यावर काही उपाय सुचवू शकाल का?'
त्या पत्रावर प्रस्तुत लेखकाने त्यांना असे कळविले की, 'तुम्ही फक्त श्रीनवनाथ भक्तीसार पोथीची
सतत पारायणे आपल्या घरात चालू ठेवा. एक दिवस तुम्हाला याचा आपोआप उलगडा होईल व तुमचा त्रासही दूर होईल.' त्यानुसार त्यांनी 'श्रीनवनाथ भक्तिसार' या ग्रंथाची पारायणे मोठ्या भक्तिभावाने सुरू केली. असेच आठ महिने उलटले. परंतु त्यांचा प्रश्न अजून तसाच होता, त्यामुळे त्यांनी कंटाळून पारायणे बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यापूर्वी 'पारायणे बंद करू का?' असे प्रस्तुत लेखकाला पत्र लिहून विचारले. असेच आणखी चार महिने उलटले. आणि एक दिवस एक चमत्कार घडला नि पारायणाचा अगदी जिवंत अनुभव त्यांना मिळाला!!
तो अनुभव असा-
दोन दिवसांपूर्वी त्यांची सावत्र आई त्यांच्याकडे राहावयास आली होती. त्या दिवशी रात्री आपले नित्याचे पारायण संपवून त्यांनी श्रीनवनाथांची आरती म्हणण्यास सुरुवात केली. आणि त्याच वेळी त्यांची आई एकाएकी घुमू लागली. ते पाहून वकील महाशयांना थोडे आश्चर्य वाटले व त्यांनी थोडे धाडस करून, 'तू कोण आहे?' असा वकिली थाटात तिला प्रश्न केला. त्यावर ती म्हणाला, 'मी कोकणाई देवी आहे.' 'पण तू इथे कशाला आलीस?' वकिलांचा प्रश्न 'तुझे वाटोळे करण्यासाठी....' 'तुला इकडे कुणी पाठवले?' 'तुझ्या सावत्र आईनेच मला इथे पाठविले आहे. तुम्ही सर्वजण उपाशी मरावेत अशी माझी इच्छा आहे.'
'मग त्यासाठी तू काय करतेस?'
'तुझ्या दाराबाहेर उभे राहून तुझा धंदा बंद करते.'
'आता तू येथून केव्हा जाणार आहेस?'
'आता मला जावेच लागेल.'
'कारण?'
'कारण तू रोज इथे जे वाचन करतोस त्यामुळे इथे फार काळ राहणे मला शक्य होणार नाही.' आणि त्याच वेळी आईच्या अंगातला संचार एकाएकी थांबला. नंतर थोड्याच दिवसात त्या वकिलांचा व्यवसाय पुन्हा पूर्ववत् उत्तमप्रकारे सुरू झाला हे सांगणे नकोच! सदर वकिलांनी ही सर्व हकीकत प्रस्तुत लेखकाला पत्रातून सविस्तर कळविली असून ती पत्रे प्रस्तुत लेखकाने मुद्दाम जपून ठेवली आहेत. एका नाथपंथीयाचे मार्गदर्शन(दैनिक पारायण) काही वर्षांपूर्वी प्रस्तुत लेखकाला योगायोगाने एक नाथपंथी गृहस्थ भेटले. त्यांनी बोलता बोलता या पोथीच्या पारायणाचे संदर्भात जे मार्गदर्शन केले तेही वाचकांना उपयुक्त ठरेल असे वाटल्याने ते येथे देत आहे.

'आपले जे अवघड काम नाथांकडून करून घ्यावयाचे असेल ते एका कागदावर लिहावे. सुरवातीला अर्थातच 'श्रीगणेशाय नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री दत्तात्रेयाय नमः व श्री नवनाथाय नमः' असे लिहिण्यास विसरू नये. त्यानंतर रोज एक अध्याय वाचण्याचे कबूल करून आपले काम किती मुदतीत पूर्ण व्हावे हेही खाली लिहावे व त्यांनतर खाली सही करून तारीख टाकावी. नंतर हा कागद एका पाकिटात बंद करून ते पाकीट पोथीच्या चाळिसाव्या अध्यायात ठेवून द्यावे व त्यानंतर पोथीतील एक अध्याय रोज न चुकता वाचावा. त्यात खंड पडू देऊ नये. असा क्रम ४ ते ६ महिने चालू ठेवल्यास स्वप्नातून काही संदेश मिळतो असा अनेक भक्तांचा अनुभव आहे. नवनाथ आपल्या भक्तांची कामे आपल्या बावन्न वीरांमार्फत करीत असतात. मात्र त्यांच्या कामात कुणावरही अन्याय होत नाही. उदाहरणार्थ, आमच्या ओळखीच्या एकाघरमालकांना एक बिर्हाडकरू अतिशय छळत असे. सर्व उपया करून थकल्यावर त्या गृहस्थांनी 'श्रीनवनाथ भक्तिसार' ग्रंथाचे वाचन वरील पद्धतीने सुरू केले.
आश्चर्य असे की सहाच महिन्यात त्या घरमालकांना दोन वीर त्या भाडेकरूच्या घरात घुसत असल्याचे स्वप्नात दृश्य दिसले. त्याचा अर्थ, तो भाडेकरू लवकरच जागा खाली करून निघून जाणार असे ते स्वप्न ऐकल्यावर एका थोर नाथपंथी गृहस्थांनी त्या गृहस्थांना सांगितले. परंतु त्यांना ते खरे वाटले नाही. कारण थोड्याशा भाड्यात मिळालेली, तसेच शहराच्या मध्यभागात असलेली व चांगल्या वस्तीतील हवेशीर जागा कुणी आपणहून सोडून जाईल अशी केवळ कल्पना देखील करणे कठीण होते.
परंतु एखादे काम नाथांनी मनात आणल्यानंतर त्यात अवघडते काय? आश्चर्य असे की, लवकरच त्या बिर्हाडकरूला एक चांगला फ्लॅट मिळाला व तो एक दिवस ती जागासोडून खरोखरच निघून गेला! या ठिकाणी नाथांनी कुणावरही अन्याय न करता दोघांचीही सोय केली. कारण त्यांना सर्व जीव सारखेच ?

(............................हा लेख माझा नाही, मला वाचायला मिळाला होता, म्हणून आपल्या साठी सादर केला.)